यूपीए सरकारला बाहेरून पाठिंबा देणा-या समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाने केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली- यूपीए सरकारला बाहेरून पाठिंबा देणा-या समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाने गुरुवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प ‘शेतकरीविरोधी, कामगारविरोधी व गरीबविरोधी’ असल्याची टीका त्यांनी केली आहे. या अर्थसंकल्पाला संसदेत विरोध करण्याचा निर्धार समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांनी व्यक्त केला आहे. या अर्थसंकल्पाने शेतक-यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. केवळ १० टक्के लोकसंख्येसाठी सादर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प आहे, असे मुलायम सिंह यादव यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सांगितले. ते संसदेच्या बाहेर वार्ताहरांशी बोलत होते. या अर्थसंकल्पाला कशा प्रकारे विरोध करणार हे मात्र यादव यांनी स्पष्ट केले नाही. या अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी त्याला विरोध करणार की त्या विरोधात मतदान करणार ते यादव यांनी सांगितले नाही.
हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसामध्ये संभ्रमावस्था निर्माण करणारा आहे आणि यामध्ये कोणत्याही नवीन बाबींचा समावेश नसल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे. केंद्र सरकारची धोरणे सर्वसामान्यांच्या हिताची नसून ही धोरणे लोकांच्या विरोधातील आहेत. जर काँग्रेस सरकारांनी चांगले अर्थसंकल्प सादर केले असते तर भारताची प्रगती कितीतरी आधीच झाली असती. अनुसूचित जाती-जमातींसाठी प्रत्येक अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाते. तरीही त्यांच्या समस्या कायमच आहेत, असे मायावती यांनी सांगितले.