कौटुंबिक पार्श्वभूमीवर अरे संसार संसार हे वाक्य कधी हसत हसत ओठी येतं, तर कधी समस्यांचा डोंगर घेऊन उभं राहतं. संसाराचं एक रूप जसं श्रीमंतीच्या रूपानं नांदतं तसं ते मध्यमवर्गीय देखील असतं, तर हेच रूप कधी गरिबाच्या झोपडीत देखील नांदताना दिसतं.
अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर
संसार, स्वप्न आणि हाच संसार करण्यासाठी सोसावे लागणारे आर्थिक चटके हे कुणाला चुकलेले नाहीत. आज परिस्थिती पालटली असली तरी, अत्याधुनिक युगात वावरताना, परिस्थितीशी समतोल साधताना खरोखरंच या संसाराचा डोलारा सावरताना कधी कधी सामान्य माणसाला कसरत करावी लागते.
संसारात रमलेला माणूस कधी स्वप्नांनी भारावलेला असतो, तर कधी भविष्यातील विचारांनी गांजलेला असतो. संसाराचं एक स्वप्न जसं तिचं असतं, तसं त्याचंही असतंच!
तिच्या संसाराचं स्वप्न रेखताना घरकुलांचं एक स्वप्न तिच्या अंतरंगी तरळतं, तसंच भविष्यातील प्रगतीच्या वाटाही खुणावणा-या असतात. छोटय़ा झोपडीतून मोठय़ा घरकुलापर्यंतची स्वप्न पाहताना, विचारांची, आर्थिक परिस्थितीशी सांगड घालावी लागते. कुटुंबातील माणसांची मनं जपताना होणारी तारांबळ, दोन वेळच्या अन्नासाठी करावी लागणारी धडपड पाहता, अनेक समस्यांतून मार्ग काढून संसार उभा केला जातो. वास्तव आणि स्वप्न कल्पना यात तफावत असली तरी, बरेचदा संसारात स्वप्नांना अधिक महत्त्व दिसून येते, कारण अनेक स्वप्न उराशी बाळगूनच भविष्यातील वाटा यशस्वी होताना दिसतात.
या संसारासाठी कुटुंबाची, नातेवाइकांची साथ महत्त्वाची असते. नात्यांची गुंफण आणि चांगल्या विचारांनी हे संसाराचं स्वप्न अधिक खुललं तर निर्माण होणा-या अनेक समस्यांवर मात करता येते आणि संसाराचं सुखचित्र नजरेसमोर तरळतं.