मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ सोमवारी रात्री उशीरा सोने,हिरे आणि पैशांनी भरलेले चार ट्रक प्राप्तीकर विभागाने जप्त केले.
मुंबई- मुंबईहून गुजरातकडे पैशांच्या बॅगांनी भरलेले चार ट्रक सापडल्याने मंगळवारी खळबळ उडाली असून, १०२ बॅगांमध्ये १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख आणि सोने-चांदीने दागिने आदी ऐवज सापडला. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) व प्राप्तिकर विभागाने (आयटी) यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई केली. यातील बहुतांशी रक्कम ही बेहिशेबी असल्याचा प्राथमिक अंदाज असून, अंगडियाद्वारे या बॅगा गुजरातमध्ये जात असल्याचे निष्पन्न झाले.
मुंबई सेंट्रल स्थानकाच्या दिशेने नोटांनी भरलेल्या बॅगा घेऊन काही ट्रक जात असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानुसार, सोमवारी रात्री अंगडिया व्यापा-यांचे चार ट्रक पकडले. हे संपूर्ण पैसे गुजरात मेलने गुजरातला पाठविण्यात येणार होते. त्याआधीच धाड टाकून पैशांसह सोने-चांदीने भरलले ट्रक ताब्यात घेण्यात आले.
बॅलार्ड पिअर्स येथील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात या ट्रकमधील पैशांची मोजणी करण्यात आली. मोठी रक्कम असल्याने इमारतीला पोलिसांनी कडक पहारा दिला होता. कडेकोट पोलिस बंदोबस्तातच या पैशांची मोजणी अद्याप सुरूच असून, त्यासाठी ५० हून अधिक अधिकारी कार्यरत आहेत. रोख रक्कम, हिरे व दागिन्यांची मोजणी संपल्यानंतर निश्चित आकडा देणे शक्य होऊ शकेल, असे प्राप्तिकर विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
याप्रकरणी ४५ जणांची चौकशी करण्यात आली असून, हा ऐवज १०० कोटीहून अधिक असण्याची शक्यता प्राप्तिकर विभागाचे महासंचालक स्वतंत्रकुमार यांनी व्यक्त केली आहे. प्रसिद्धी माध्यमांमध्ये हा ऐवज हजारो कोटी रुपयांचा असल्याच्या शक्यतेला स्वतंत्रकुमार यांनी नकार दिला आहे. दरम्यान काही ज्वेलर्स दागिन्यांचा ताबा घेण्यासाठी पुढे आले आहेत. त्यांची पडताळणी व तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही स्वतंत्र कुमार यांनी सांगितले. राजकीय पक्षाच्या निधीसाठी किंवा दहशतवादी कारवायांसाठी हा निधी नेला जात असल्याची शक्यता सूत्रांनी नाकारली आहे.
पकडलेल्या चारही ट्रकना मुंबई पोलिसांनी संरक्षण पुरवले होते. या संदर्भात माहिती उपायुक्त(परिमंडळ-२) निसार तांबोळी म्हणाले, ‘‘गेल्या १५ वर्षापासून अंगडियांना पोलिस संरक्षण देण्यात येते. दरोडा व लुटीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी ही प्रतिबंधात्मक योजना आहे. सोने किंवा रोख रक्कम नेताना दरोडा पडू शकतो. त्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवणे ही आमची जबाबदारी आहे.’’
‘एनआयए’ला मिळाली होती बनावट नोटांची माहिती
कोटय़वधी रुपयांच्या बनावट नोटा असलेले ट्रक मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असून, या पैशाचा वापर पुढे घातपाती कारवायांसाठी करण्याची शक्यता असल्याचे एनआयए विभागाच्या माहितगारांनी दिली होती. या दाव्यामुळे एनआयएचा मोठा फौजफाटा घटनास्थळावर दाखल झाला. त्यांनी मुंबई सेंट्रल स्थानकावर हे ट्रक पकडले. बनावट नोटांचा दाव्यावर तोंडघशी पडलेल्या एनआयएला आता हा पैसा बेकायदेशीर असल्याचे सिद्धही करता आले नाही. हवाला व्यवसाय हा ७० वर्षापासून मुंबईत सुरू असून, त्यातील बरेच कारभार अधिकृतरीत्या चालतात. पण त्यातील काही अंगडिया बेकायदेशीररीत्याही रोख रक्कम व वस्तूंची ने-आण करीत असल्याच्याही काही घटना पुढे आल्या आहेत. या ने-आण करण्यात वस्तू चोरी होण्याची मोठी भीती असते. तरीही मुंबईतील हिरे व्यापारी हिरे पॉलिश करण्यासाठी गुजरातला पाठविण्याला प्राधान्य देतात. कारण मुंबईत हिरा पॉलिश करणा-या एका कारागिरासाठी १२ ते १५ हजार रुपये मोजावे लागतात. तेथे गुजरातमध्ये हा कारागीर ३ हजार रुपयात उपलब्ध होतो. याशिवाय तेथे करातची बरीच सूट मिळते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे यापूर्वीही अशाप्रकारच्या चुका झाल्या आहेत.