संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या अफझल गुरूला फाशी देण्याची मागणी करून भाजप आणि शिवसेनेने लोकसभेत गोंधळ घातला.
नवी दिल्ली- संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या अफझल गुरूला फाशी देण्याची मागणी करून भाजप आणि शिवसेनेने लोकसभेत गोंधळ घातला. त्यामुळे कनिष्ठ सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. यावेळी संतप्त झालेल्या सभापती मीरा कुमार यांनी सदस्यांना खडसावले, पण सदस्यांनी त्याकडे दुर्लक्षच केले.
संसदेवरील हल्ल्याला गुरुवारी अकरा वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने लोकसभेत शहिदांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर, भाजपच्या शाहनवाज हुसैन यांनी अफझल गुरूला ताबडतोब फाशी द्यावी अशी मागणी करत घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यांना पाठिंबा देत शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली.
‘अफझलला ताबडतोब फाशी देणे हीच संसद हल्ल्यातील शहिदांनी खरी श्रद्धांजली राहील’ असे म्हणत त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी बसपच्या खासदारांनी कोळसा खाण वाटप घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करून गोंधळात भर घातली.
मात्र, सभापती मीरा कुमार यांनी गोंधळाकडे दुर्लक्ष करून कामकाज पुकारले आणि ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश यांनी ग्रामीण रोजगार योजनांसंबंधी पुरवणी प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात केली. मात्र, गोंधळामुळे काहीच ऐकू येत नसल्याने त्यांनी आधी साडेअकरापर्यंत आणि नंतर दुपारी दोन पर्यंत कामकाज तहकूब केले. राज्यसभेतही विरोधकांनी या मुद्दयावरून गोंधळ घातला.
मीराकुमार संतापल्या!
खासदारांच्या वर्तनामुळे संतापलेल्या कनिष्ठ सभागृहाच्या सभापती मीरा कुमार यांनी त्यांना खडे बोल सुनावले. बरोबर अकरा वर्षापूर्वी संसदेचे संरक्षण करताना तेराजण शहीद झाले होते, ते तुमच्या या अशा वागण्यासाठी नव्हे. मी सभागृहाचे कामकाज तहकूब करणार नाही अशी तंबी संतप्त मीरा कुमार यांनी गोंधळ घालणा-या खासदारांना दिली. पण अखेर कामकाज तहकूब करावेच लागले.