अफगाणिस्तानात लोकशाही शासन प्रणालींची मूल्ये जोपासण्याबरोबरच तेथे नव्याने करण्यात येणा-या पुनर्बाधणीत भारताचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी केले.
पुणे – अफगाणिस्तानात लोकशाही शासन प्रणालींची मूल्ये जोपासण्याबरोबरच तेथे नव्याने करण्यात येणा-या पुनर्बाधणीत भारताचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी केले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया अँण्ड डेव्हलपमेन्ट पार्टनरशिप्स इन एशिया अँण्ड आफ्रिका’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत केलेल्या बीजभाषणात करझाई बोलत होते. राज्यपाल के. शंकरनारायणन्, सिम्बायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, अध्यक्ष अरिवद संगमनेरकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे आणि प्रधान संचालिका विद्या येरवडेकर या वेळी उपस्थित होते.
महाभारत काळापासून ते आजपर्यंत अफगाणिस्तान आणि भारताचे संबंध सौहार्दपूर्ण आणि मैत्रीचे असल्याचे नमूद करून करझाई पुढे म्हणाले, ‘वेगवेगळ्या कारणांमुळे झालेली युद्धे आणि दहशतवाद्यांच्या कारवाईमुळे तेथील अर्थव्यवस्था व राजकीय प्रणालीस गंभीर धोका निर्माण झाला होता. भारताने सच्चा मित्र या नात्याने अफगाणिस्तानच्या पुनर्बाधणीत महत्त्वाची भूमिका बजावली. दोन बिलियन डॉलरच्या अर्थ सहाय्याबरोबरच तेथे सिंचन प्रकल्पांची, आरोग्य केंद्राची उभारणी, शाळा, महाविद्यालयास भारतीय शिक्षक पाठविण्याबरोबरच दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी भारताने मोठी मदत केली आहे. आज भारतात अफगाणिस्तानचे विद्यार्थी व्यवस्थापन, वैद्यकीय शिक्षण, संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. त्यासाठी भारत सरकारने शिष्यवृत्ती दिली आहे. दहा वर्षानंतर हे विद्यार्थी अफगाणिस्तानात परत येऊन देशाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावू शकतील, असे ते म्हणाले.
अफगाणिस्तानात लोकशाहीची मूल्ये रुजविण्यात भारताने सर्व प्रकारचे सहाय्य केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आणि अफगाणिस्तानचे मैत्रीपूर्ण संबंध जागतिक शांततेस ते पूरक असल्याचे करझाई यांनी सांगितले. टांझानिया, दुबई, भुतान, इराण, टर्की, सेनेगल, अफगानिस्तान, आशियाई व आफ्रिका खंडातील देशांचे राजनतिक प्रतिनिधी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी या परिषदेस उपस्थित होते.