‘भारत माता की जय’ जे बोलणार नाहीत, त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी विरोधी सदस्यांनी सभागृहात राष्ट्रध्वज फडकावले.
मुंबई- ‘भारत माता की जय’ जे बोलणार नाहीत, त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी विरोधी सदस्यांनी सभागृहात राष्ट्रध्वज फडकावले. ते फडकावताना ध्वजाचा अवमान झाल्याचा आक्षेप सत्तारुढ सदस्यांनी घेतला. यात तालिका अध्यक्षांकडून काँग्रेसचे सदस्य नितेश राणे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. मात्र, त्याबाबत खुलासा झाल्याने या प्रकरणात सदस्य नितेश राणे यांचे नाव तालिका अध्यक्षांनी विधानसभेच्या कामकाजातून काढले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात गदारोळ घातला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.
त्यातच राष्ट्रध्वजाचा अवमान दोन सदस्यांकडून झाल्याचा आक्षेप सतारुढ सदस्यांनी केला. सभागृहात सदस्यांनी आपणास ही नावे सांगितल्याचे तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी सांगितले.
त्यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार आक्षेप घेत स्पष्टीकरण दिले. तसेच सभागृहाचे व्हिडीओ रेकॉर्डिग तपासूनच नावे घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
अखेर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी ही नावे विधानसभा कामकाजातून काढण्याचे निर्देश दिले. त्यामुळे काँग्रेस सदस्य नितेश राणे यांचे नाव या राष्ट्रध्वज अवमान प्रकरणातून काढून टाकले.