दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी वाढल्यानंतर सम-विषम क्रमांकाच्या वाहनांचा प्रयोग करण्यात आला. पण तो वरवरचा इलाज आहे. खरा इलाज आहे तो म्हणजे वाहनांच्या विक्रीवर बंधने आणण्याचा.
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी वाढल्यानंतर सम-विषम क्रमांकाच्या वाहनांचा प्रयोग करण्यात आला. पण तो वरवरचा इलाज आहे. खरा इलाज आहे तो म्हणजे वाहनांच्या विक्रीवर बंधने आणण्याचा. शहरांमध्ये लोकसंख्या वाढली की, जसा शहराच्या मूलभूत सगळयाच सुविधांवर ताण पडतो त्याचप्रमाणे शहरांमध्ये वाहनांचे प्रमाण वाढले की, अनेक समस्या निर्माण होतात. वायू प्रदूषणाची पातळी वाढते, अपघात वाढतात, वाहतूक नियमांचे उल्लंघन वाढते, वाहतूक कोंडी होते.
वाहतूक कोंडी वाढली की, प्रदूषण वाढते आणि वेळ वाचवण्यासाठी घेतलेले वाहन रस्त्यावरच ठाण मांडून उभे राहते. यातून वाचण्यासाठी मग वाहतूक नियमांचे उल्लंघन अगदी सर्रासपणे केले जाते. मुंबईत तर पदपथावरूही दुचाक्या नेल्या जातात. सायकल फक्त सार्वजनिक उद्यानात किंवा मैदानात चालवल्या जातात. रस्त्यावरून चालले धोकादायक बनले आहे. रस्ते वाहनांसाठी आहेत तर मग पदपथांवरून लोकांनी चालावे, अशी सोयही आज राहिलेली नाही.
हे कमी होते की, काय म्हणून मुंबईतील गेल्या काही वर्षात आणि महिन्यांत झालेले अपघात हे बेदरकार वाहनचालकांनी रात्रीच्या वेळी केलेले आहेत. हे अपघात पूर्णपणे वेगळे आहेत. रात्रीच्या वेळी पब किंवा मोठया हॉटेल्समधून बाहेर पडून बेदरकारपणे गाडी चालवायची. मग पुढे नाकाबंदीसाठी उभे असलेले पोलीस असो की, रात्री शतपावली करण्यासाठी निघालेले जोडपे असो की, रस्त्यावर झालेले निराधार किंवा बेघर कुटुंब असो, अशा गाडयांखाली लोकांना चिरडले जाते. पायधुनीत पाच जणांना एका मसिर्डिजने चिरडले आहे.
रात्री बेदरकारपणे गाडी चालवून त्याने रस्त्यावर झोपलेल्या कुटुंबाला चिरडले. बेदरकारपणे गाडी चालवून रात्री-अपरात्री लोकांना चिरडणारे लोक व्यसनी असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. अभिनेता सलमान खान असो की, महिला वकील, दारूच्या किंवा अन्य गोष्टींच्या अमलाखाली या लोकांनी अनेकांचे जीव घेतले आहे. जीवघेण्याचा हा प्रकार अघोरी आहे.
मुळात दारू पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा असताना त्याबाबत कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. नुसता दंड हा कायदेशीर पर्याय आता निकामी झालेला आहे. दारू पिऊन गाडी चालवण्याबाबतची शिक्षा वेगळी आणि त्याचबरोबर गाडीचा अपघात केला किंवा गाडीने एखाद्या निष्पाप व्यक्तीला चिरडले, धडक दिली तर त्याबाबद्दचा गुन्हा वेगळा नोंदवला जावा.
हे गुन्हे मुळात अजामीनपात्र असावेत. अशीही तरतूद केली जावी. वाहतूक पोलीस हे वाहनचालकांना त्यांचे नोकर वाटतात किंवा वाहतूक पोलीस हे दोन नोटा हातात सरकवल्या की, कारवाई न करणारे वाटतात. हे किमती गाडीतील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या लोकांना आपण वाहतूक पोलिसांना सहज विकत घेऊ शकतो आणि त्यांना विकत घेतले नाही तरी न्यायालयात सहज सुटू शकतो, असे समज असणारे असतात. हा त्यांचा समज या आधी अशा प्रकारच्या घटनांमधून सहीसलामत सुटल्यामुळे झालेला असतो.
पोलिसांची कारवाई जरी योग्य असली तरी काही वेळा न्यायालयात पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटतात. पण त्यावर आता उपाय शोधता येऊ शकतो. संपूर्ण दक्षिण मुंबईत आता सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात आले आहे. त्याचा वापर अशा बेदरकारपणे गाडी चालवणा-या वाहकांविरोधी सबळ पुरावा म्हणून होऊ शकतो.
नियमांचे उल्लंघन असो की, अपघात असो त्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेण्याची वेळ आता आली आहे. आरोपीला जोपर्यंत योग्य शिक्षा होत नाही तोपर्यंत तसा संदेश समाजापर्यंत जात नाही. तोपर्यंत हा बेदरकारपणाही कमी होणार नाही. त्याचबरोबर अशा दारू पिऊन अपघात करणा-या वाहनचालकांच्या शिक्षेत वाढ करणे आवश्यक आहे.
लोकांना जर रस्त्याने चालता येत नसेल, बाहेर भटकता येत नसेल तर मग मुंबईतील किंवा देशातील नागरिक सुरक्षित आहेत, असे म्हणता येणार नाही. चालकांच्या बेदरकारपणाला आळा घालण्यासाठी कठोर शिक्षा आणि शिक्षेत वाढ ही असलीच पाहिजे.