म्हाडाने नुकत्याच जाहीर केलेल्या १६ अतिधोकादायक इमारतींतील ८८ रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी स्थलांतरित केले जाणार आहे.
मुंबई – म्हाडाने नुकत्याच जाहीर केलेल्या १६ अतिधोकादायक इमारतींतील ८८ रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी स्थलांतरित केले जाणार आहे. या धोकादायक उपकर इमारतीत मागील वर्षीच्या नऊ इमारतींचा समावेश करण्यात आला आहे.
अतिधोकादायक इमारतींमध्ये ६८३ रहिवासी आहेत. यातील दोन इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने त्यातील १४४ रहिवाशांची पर्यायी व्यवस्था विकासक करणार आहेत. बोटावाला चाळ – सी व डी या दोन इमारतींना पुनर्विकासासाठी सरकारने मान्यता दिल्याने यातील १८६ रहिवाशांपैकी १७९ रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून, उर्वरित सात रहिवाशांची विकासकामार्फत पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच १७५ रहिवाशांपैकी ८७ रहिवाशांनी स्वत:च इतरत्र राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे उर्वरित ८८ रहिवाशांना येत्या पावसाळ्यापूर्वी स्थलांतरित करण्यात येणार आहे.
म्हाडाची १८०० संक्रमण शिबिरे सध्या उपलब्ध आहेत. यातील ४०० गाळे धारावीत आहेत. पुनर्विकासादरम्यान रहिवाशांनी या संक्रमण शिबिरात राहण्याची तयारी दर्शवल्यास त्यांना संक्रमण गाळे उपलब्ध केले जाणार आहेत. येत्या १० ते १२ दिवसांत ८७ रहिवाशांना या धोकादायक इमारतीतून स्थलांतरित करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी डॉ. रमेश सुरवाडे यांनी दिली.