अण्णा हजारे हे कार्यकर्ते राहिले आहेत की नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याला कारणही तसेच आहे. काँग्रेसप्रणीत केंद्र व राज्यातील सरकारमध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला आहे, होत आहे, याची माहिती देणा-या पत्रकार परिषदा, आंदोलने करून हजारे यांनी गेल्या पंधरा ते अठरा वर्षात समाजकारणात चांगलेच नाव कमावले आहे. याच अण्णांना माजी मंत्री सुरेश जैन यांनी इंगा दाखवलेला होता. असे हे अण्णा गेल्या तीन वर्षापासून तसे शांत, शांतच आहेत. पण आता त्यांनी तोंड उघडले आहे. तेही मतदानयंत्राबाबत.
लोकसभा निवडणुकीपासून मतदानयंत्रात भाजपाकडून काहीतरी फेरफार करण्यात येत आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश पाहता, हे यश विस्मयकारक आहे. पण असे यश इतक्या सहजासहजी मिळणे शक्य आहे का, त्यातल्या त्यात उत्तर प्रदेशसारख्या राज्यात. त्यामुळे या मतदानयंत्राबाबत बसपाच्या मायावती असो किंवा पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असो वा काँग्रेसजन साशंक आहेत. लोकशाहीत त्यांना आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी या मतदानयंत्राबाबत शंका उपस्थित केल्यास ते चुकीचे कसे?
असे असताना या वादात थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाग घेतला आहे. मतदानयंत्राबाबत संशय घेणे चुकीचे आहे, असे रेचकच त्यांनी मतदानयंत्राबाबत संशय घेणा-यांना दिले आहे. पूर्वी बॅलेट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया राबवली जायची. ही प्रक्रिया लोकशाहीत योग्य होती. पण त्याचाही गैरवापर काही राजकीय मंडळींकडून सर्रास होऊ लागल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याला पर्याय म्हणून ईव्हीएम मशीन्स आणल्या. पण या मशीनमध्ये गडबड, घोटाळाही होऊ शकतो, हे सत्ताधा-यांना कळत नाही. समजा त्यांना कळत नसेल, असे आपण गृहीत धरूया. पण अण्णा हजारेंना तरी ते अवगत व्हायला हवे की नको. त्यांच्या समाजकारणाच्या अनेक वर्षाच्या काळात त्यांनी अनेक घोटाळे बाहेर काढलेले आहेत. घोटाळे करणारे किती तरबेज असतात, याची चांगलीच जाण अण्णांना असताना त्यांनी मतदानयंत्राचे समर्थन करावे हे संयुक्तिक वाटत नाही. जपान या देशाने हे यंत्र विकसित केलेले आहे. पण या देशातील मतदान प्रक्रिया या यंत्रावर होत नाही, असे सांगितल्यास आश्चर्य वाटायला नको.
यंत्राची निर्मिती मानव करू शकतो, तसाच तो या यंत्रांमध्ये फेरफारही करू शकतो, याची साधी माहिती अण्णांना नाही का? की केंद्रातील सरकार रामराज्य आणत आहे, या राज्यात सारे काही आलबेल सुरू आहे, या भ्रमात अण्णा वावरत आहेत. याची उत्तरे अण्णा यांनी द्यायची आहेत. त्यामुळे मतदान यंत्राबाबत अण्णांचे मत अप्रस्तुत वाटते.