उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.
मुंबई- सिंचन प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांमुळे व्यथित होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य १९ मंत्र्यांचे राजीनामे मात्र त्यांनी फेटाळून लावले आणि गेले तीन दिवस सुरू असलेल्या राजीनामानाटय़ावर अखेर पडदा पडला. सिंचन प्रकल्पाबाबत होत असलेल्या आरोपांबाबत सत्य जनतेसमोर येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
राज्यातील सिंचन प्रकल्पांत घोटाळे झाल्याचे आरोप झाल्याने अजित पवार यांनी मंगळवारी नाटय़मयरीत्या राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. गेले तीन दिवस याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी पक्षाध्यक्ष शरद पवार मुंबईत आले. त्यांनी तीन टप्प्यांत बैठका घेतल्या.
राज्यातील सिंचन प्रकल्पाबाबत होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी दिलेला राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. याबाबतची श्वेतपत्रिका काढण्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जी घोषणा केली आहे, त्यालाही आमचा पाठिंबा आहे. सिंचनावर किती खर्च झाला, त्याच्या बदल्यात किती पाणी अडवले गेले, त्यातील पिण्यासाठी किती वापर होत आहे, उद्योगासाठी किती वापर होतो आणि प्रत्यक्ष सिंचन किती झाले हे जनतेसमोर आले पाहिजे. प्रकल्पावर खर्च झाला, असे म्हटले तरी त्यात अनेक मुद्दे असतात. पुनर्वसनावरही मोठय़ा प्रमाणात खर्च होतो, या सर्व बाबींचा अंतर्भाव श्वेतपत्रिकेत व्हावा. – शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष.
राज्यात निर्माण झालेली परिस्थिती आणि अजित पवार यांची राजीनाम्यामागची सविस्तर भूमिका जाणून घेण्यासाठी पहिली बैठक सकाळी ११.४५ वाजता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित होते. त्यानंतर सव्वातीन वाजता दुसरी बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्री आणि नेत्यांमध्ये झाली. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, मधुकर पिचड, सुनील तटकरे, बबनराव पाचपुते, राजेश टोपे आदींची उपस्थिती होती. त्यानंतर विधानभवनात सर्व आमदारांसोबत सायंकाळी ४.१५ वाजता बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांचे पहिले भाषण झाले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी आमदारांच्या भावना व्यक्त केल्या. त्यापूर्वी अजित पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, असे निवेदन पक्षाच्या आमदारांनी शरद पवार यांना दिले. त्यानंतर शरद पवार यांचे १० मिनिटांचे भाषण झाले. या भाषणात त्यांनी सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुटुंब म्हणून काम करण्याच्या सूचना केल्या. आमदारांच्या भावना योग्य असल्या तरी ज्या विषयासाठी राजीनामा दिला आहे, त्याची तड लागणे आवश्यक असल्याचे पवार यांनी सांगितले.
शरद पवार हे माझे दैवत असून, त्यांनी दिलेला प्रत्येक निर्णय मला मान्य आहे. उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत आपण सर्वाना सोबत घेऊन काम केले आहे. मात्र पाटबंधारे विभागातील कामांबाबत आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. पाटबंधारे विभागासंदर्भात माझ्याविरोधात जे आरोप झाले, ते षड्यंत्र आहे. त्यामागे कोण आहे हे मला माहीत आहे. मी जो निर्णय घेतला आहे, तो पक्षवाढीसाठी घेतला आहे. – अजित पवार
अजित पवार यांचे राजीनामा नाट्य संक्षिप्त स्वरुपात
मंगळवार २५ सप्टेंबर
संध्या. ५ वाजता – राज्यातील सिंचन प्रकल्पाबाबत होत असलेल्या आरोपांनी व्यथित होऊन उपमुख्यमंत्री पदासह सर्व पदांचा राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याकडे दिला.
संध्या. ६.४७ वाजता – अजित पवारांची भूमिका योग्यचं असल्याचं शरद पवारांनी केली पाठराखण
संध्या. ९ वाजता – अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या पदाधिका-यांची मुंबईत बैठक
बुधवार २६ सप्टेंबर
दुपारी १२ वाजता – अजित पवारांचे समर्थक रस्त्यावर, बारामतीमध्ये कडकडीत बंद
दुपारी २ वाजता – राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक, दिल्लीतही हालचालींना वेग
गुरुवार २७ सप्टेंबर
सकाळी १०.३० वाजता – ‘राजीनाम्याचा विषय संपला’ शरद पवारांची स्पष्टोक्ती
दुपारी १२ वाजता – काँग्रेस हायकमांडनेही मुख्यमंत्री बदलणार नाही असं सांगितलं.
दुपारी १.३० वाजता – काँग्रेसचे सर्व आमदार मुख्यंमंत्र्यांच्या पाठिशी, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा विश्वास
शुक्रवार २८ सप्टेंबर
सकाळी ११ वाजता – शरद पवार यांचे मुंबई विमानतळावर आगमन
सकाळी १२.45 वाजता – शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची पटेल यांच्या वरळी येथील निवासस्थानी बैठक, दीड तास चालली चर्चा
दुपारी ३ वाजता – नरिमन पॉईंट येथील यशवंतराव सभागृहात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरु. बैठकीत शरद पवारांसह, अजित पवार, मधुकर पिचड, प्रफुल्ल पटेल, आर.आर.पाटील, सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित
दुपारी ४ वाजता – राष्ट्रवादीच्या आमदारांची विधानभवनात बैठक,
संध्या. ५ वाजता – अजित पवारांचे भाषण, शरद पवार माझे दैवत असल्याचं वक्तव्य
संध्या ५.३० वाजता – अजित पवारांचा राजीनामा मंजूर झाल्याची घोषणा. राजीनामा मंजूरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितले.