आज अग्निशमन दिन व अग्निशमन सप्ताह. आता पुन्हा एकदा सर्व जण जागे होतील या आठवडयापुरते, वीरगती प्राप्त झालेल्या जवान व अधिका-यांचा श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करून अग्निशमन सुरक्षेवर व्याख्याने, प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येतील व तद्नंतर परत कधीतरी असाच भयानक उद्रेक होईपर्यंत सर्वकाही विसरून परत एकदा दैनंदिन कामात सर्व जण मश्गूल होऊन जातील.
९ मे २०१५ रोजी महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारताच्या अग्निशमन सेवेसाठी एक काळा दिवस.
काळबादेवी, मुंबई येथील ५० वर्षाहून जुन्या लाकडी बांधणीच्या पाच मजली इमारतीमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये माझे मित्र व माजी सहकारी सुनील नेसरीकर, मुख्य अग्निशमन अधिकारी सुधीर अमिन, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय राणे, केंद्र अधिकारी महेंद्र देसाई, केंद्र अधिकारी यांना भीषण आगीशी तोंड देताना वीरगती प्राप्त झाली. अत्यंत दुर्दैवी घटना.
या भीषण अग्नीच्या उद्रेकामुळे व झालेल्या प्रकारामुळे सर्वच यंत्रणा हादरून गेल्या. तद्नंतर वृत्तपत्रे, सर्व बातम्यांच्या वाहिन्यांवर काही दिवस फक्त अग्निशमन सुरक्षा याबाबतच चर्चा होत होत्या, मग हळूहळू आप्तेष्ट व मित्रमंडळी व्यतिरिक्त सर्व जणांना नेहमीचेच धावपळीचे जीवन जगत असताना या भयानक उद्रेकाचा विसर पडू लागलाय.
आता नेहमीप्रमाणे परत एकदा येतोय १४ एप्रिल. म्हणजेच अग्निशमन दिन व अग्निशमन सप्ताह. आता पुन्हा एकदा सर्व जण जागे होतील या आठवडयापुरते, वीरगती प्राप्त झालेल्या अग्निशामक व अधिका-यांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करून अग्निशमन सुरक्षेवर व्याख्याने, प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येतील व तद्नंतर परत कधीतरी असाच भयानक उद्रेक होईपर्यंत सर्वकाही विसरून परत एकदा दैनंदिन कामात सर्व जण मश्गूल होऊन जातील.
अग्निशमन अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पितामह असलेले महाराष्ट्र राज्याचे अग्निशमन सल्लागार मिलिंद देशमुख यांच्या चिकाटी, पाठपुरावा व अथक परिश्रमाने महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ६ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन सुरक्षा उपाययोजना अधिनियम २००६ तसेच त्या अनुषंगाने २३ जून २००९ पासून महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन सुरक्षा उपाययोजना नियम २००८ लागू केला.
परंतु सर्वांच्याच या विषयातील औदासीन्यतेमुळे ज्याप्रकारे या कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे त्याप्रकारे ती होत नाही. कायद्याच्या अंमलबजावणीची आज गरज आहे. पोलीस दलाप्रमाणे अग्निशमन दलाचा संवर्ग निर्माण करण्याची, आज गरज आहे. महाराष्ट्रातील सर्व अग्निशमन सेवा एका स्वतंत्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या अखत्यारित आणण्याची, राज्यातील प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये योग्य तो प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारी वर्ग उपलब्ध करून देऊन त्यांना योग्य ती वाहने, उपकरणे व यंत्रे उपलब्ध करण्याची आज गरज आहे.
सामान्य नागरिकांना प्रशिक्षण देऊन स्वयंसेवकाची फौज (Volunteer Force) निर्माण करण्याची, महाराष्ट्रासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करून अग्निशमन सेवेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर तीन आकडी ‘१०१’ दूरध्वनी क्रमांक लागू करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील इतर सर्वसामान्य जनतेचा असा समज आहे की, सर्वात जास्त आगी या कारखाने, कार्यालये अथवा इतर ठिकाणी लागतात व या आगीमध्ये जास्तीत जास्त माणसे जखमी व मृत होतात; पण तुम्ही खरंच आश्चर्यचकित व्हाल! हे समीकरण एकदम उलट आहे.
आज भारतात सर्वात जास्त आगी या राहत्या वस्तीतील असून या आगीमध्येच जखमी व मृताची संख्या सर्वात जास्त असते व त्याची महत्त्वाची कारणे असतात विद्युत उपकरणे व स्वयंपाकघरातील निष्काळजीपणा आणि अगिशमनाबद्दलचे अज्ञान.
अग्निशामकाला पहिल्या दिवसापासून शिकवण्यात येते की आग विझवणे म्हणजे आगीचे मूळस्थान शोधून काढून कमीत कमी वेळात व कमीत कमी नुकसानात आगीवर ताबा मिळवणे व सर्वप्रथम अडकलेल्यांची सुटका करणे. मग एक सामान्य सुजाण नागरिक म्हणून आपणही प्राथमिक स्वरूपाच्या आगीवर नियंत्रण नाही का करू शकत? नक्कीच करू शकतो!
आग लागल्यावर जर आपल्याला आग विझवण्याबाबतचे ज्ञान असेल तर आपण प्राथमिक स्वरूपाच्या आगीवर ताबा मिळवून आग विझवूच, शिवाय होणारे मोठे नुकसानही टाळू शकू, त्यासाठी आपल्याला काही छोटया छोटया गोष्टी माहीत असणे गरजेचे असते.
आग कुठल्या प्रकारची आहे, यावर आग विझवण्याच्या पद्धती अवलंबून असतात. जगातील सर्व अग्निशमन सेवा आग विझवण्यासाठी थंड करणे, उपासमार करणे, दडपणे या तीन पद्धतीने आगीवर नियंत्रण करतात. प्रत्येक अग्निशामकाला प्रशिक्षण देताना आगीचा त्रिकोण व आग विझवण्याचा त्रिकोण पहिल्या दिवसापासून मनात बिंबवला जातो.
आपणही याचा थोडासा अभ्यास केल्यास सहजपणे आगीवर नियंत्रण मिळवू शकतो. आगीचा त्रिकोण म्हणजे उष्णता, हवा व जळाऊ पदार्थ या तीन गोष्टी योग्य प्रमाणात एकत्र आल्या तर आग लागते व हीच आग नियंत्रणाबाहेर गेली की, त्यावर लगेच नियंत्रण मिळवणे गरजेचे असते. ही नियंत्रणाबाहेरील आग प्राथमिक अवस्थेत नियंत्रणात आणली तर नुकसानही कमी होऊ शकते.
या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी आगीच्या त्रिकोणातील घटकांपैकी एक अथवा दोन अथवा तीनही गोष्टींवर नियंत्रण करता आले तर आग विझते, व त्यालाच म्हणतात आग विझवण्याचा त्रिकोण म्हणजे थंड करणे, दडपणे व आगीची उपासमार करणे. आगीची उष्णता कमी करायची असेल, तर पाण्याचा वापर करा व आगीला थंड करा. जळणा-या पदार्थाच्या जवळील इतर जळाऊ पदार्थ बाजूला करा अथवा जळणारा पदार्थच बाजूला करा, त्यामुळे होणारे नुकसान कमी होऊ शकते, म्हणजेच काय तर आगीची उपासमार करा. शाळेत आपल्याला शिकवले जाते आपल्या कपडयांना आग लागल्यास जमिनीवर लोळा अथवा ब्लँकेट/ चादर घट्ट लपेटून घ्या.
कढईमधील तेलाला आग लागल्यास गृहिणी पटकन त्या कढईवर झाकण टाकते म्हणजेच आगीचा संपर्क हवेपासून तोडला जातो व आग दडपून विझवली जाते. इलेक्ट्रिक केबल अथवा वायरिंगला आग असेल तर सुकी वाळू अथवा योग्य ते एक्स्टिंग्विशर वापरले जाते, या प्रकारातही हवेचा संपर्क आगीपासून तोडला जातो व तद्नंतर आगीवर ताबा मिळवला जातो व विद्युत पुरवठा बंद करून आगीवर नियंत्रण मिळवले जाते.
अग्निशमनासाठी उंच इमारती, कारखाने व्यावसायिक इमारतीमध्ये विविध प्रकारची अग्निशमन यंत्रणा बसवलेली असते व ही यंत्रणा तेथील प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व अग्निशमन विभागातील कर्मचा-यांना कशा प्रकारे वापरावी याची पूर्णपणे माहिती असते; परंतु प्राथमिक स्वरूपाच्या आगीमध्ये योग्य प्रकारचे एक्स्टिंग्विशर्सचा वापर योग्य प्रकारे केल्यास आग नियंत्रणात ठेवणे सहज शक्य असते. एक्स्टिंग्विशर्स ही इमारतीमधील त्या ठिकाणच्या धोक्यानुरूप ठेवण्यात येतात व इमारतीमधील रहिवाशांनी प्राथमिक स्वरूपाच्या आगीवर त्यांचा वापर करावा हाच खरा उद्देश असतो.
सर्वसाधारणपणे ड्राय पावडर केमिकल एक्स्टिंग्विशर्स किंवा ए.बी.सी. ड्राय पावडर केमिकल एक्स्टिंग्विशर्स सर्वत्र ठेवलेली आढळतात, कारण कुठल्याही प्रकारच्या आगीवर सहजपणे त्यांचा वापर करता येतो, परंतु आगीच्या वर्गीकरणानुरूप चार प्रकारची एक्स्टिंग्विशर्स प्रचलित आहेत. लाकूड, कपडा, कागद इत्यादीच्या आगीसाठी वॉटर सीओटू प्रकारचे एक्स्टिंग्विशर्स वापरतात, ज्यामध्ये पाणी सीओटू वायूच्या दाबाने बाहेर पडून आग थंड करून विझवली जाते.
AFFF फोम प्रकारचे एक्स्टिंग्विशर्स तेलाच्या किंवा द्रव पदार्थाच्या आगीवर नियंत्रण करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये साबणाच्या फेसासारखा पदार्थ तेलावर तरंगून दडपून आग विझवली जाते. सीओटू एक्स्टिंग्विशर्स अथवा ड्राय पावडर केमिकल एक्स्टिंग्विशर्स वापरताना आगीला मिळणा-या हवेचे प्रमाण कमी करून आग विझवली जाते.
एक्स्टिंग्विशरवर लिहिलेल्या सूचनांचे पालन करून ही उपकरणे सहजपणे कोणीही वापरू शकतो; परंतु त्यासाठी त्यांची योग्य ती देखभाल व त्यावरील वापरासंबंधीच्या सूचनांकडे इतर वेळी लक्ष देणे तेवढेच आवश्यक नाही का? पण इथेच आपण चुकतो व त्याकडे दुर्लक्ष करतो व त्यामुळे आगीच्या वेळी त्यांच्या योग्य तो वापर आपण करू शकत नाही.
अग्निसुरक्षा फक्त अग्निसुरक्षा उपकरणे बसवून पूर्ण होत नाही, त्यासाठी हवी असते इमारतीच्या आराखडयाला मंजुरी घेतानाच इमारतीच्या सुरक्षतेबाबतच्या उपाययोजनेचे नियोजन.
एक चांगला वास्तुविशारद इमारतीच्या नकाशा पूर्णत्वाला नेत असताना इमारतीच्या सुशोभीकरणाबरोबरच अग्निसुरक्षेला सुद्धा तेवढेच प्राधान्य देतो. इमारतीच्या बांधकामाच्या आराखडयाला मंजुरी घेताना वास्तुविशारद अग्निसुरक्षेचा व त्यावरील उपाययोजना अॅक्टिव्ह व पॅसिव्ह या दोन प्रकारच्या यंत्रणेचा विचार करून त्याचे नियोजन करतो. पॅसिव्ह प्रकारात योग्य मोकळी जागा, जिने, दरवाजे कॉरिडोर, पॅसेजेस, लिफ्ट लॉबी बांधकामाची उंची, वायुविजन, रिफ्जुय एरिया इत्यादी अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत असतात.
आग लागू नये किंवा आग लागल्यावर आग पसरू नये म्हणून प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षपणे या गोष्टींना फारच महत्त्व असून चांगला वास्तुविशारद या गोष्टींना प्रामुख्याने प्राधान्य देतो व याच गोष्टी इमारतीमधील लोकांच्या सुटकेसाठी व अग्निशमन कर्मचा-यांना योग्य प्रकारे इमारतीमध्ये प्रवेश करून आगीवर ताबा मिळविण्यासाठी उपयोगी ठरतात.
दुसरा भाग अॅक्टिव यंत्रणा, यामध्ये पाण्याची आगीच्या वापरासाठी असलेली टाकी, शुष्क उन्मार्ग किंवा आर्द्र उन्मार्ग (रायझर सिस्टीम), नळखांब (हायड्रन्ट), स्वयंचलित तुषार यंत्रणा, होजरिल इत्यादी अनेक यंत्रणेचा समावेश असतो. या सर्व यंत्रणेचा प्रत्यक्ष अग्निशमनासाठी उपयोग केला जातो.
त्या व्यतिरिक्त स्वयंचलित तपास व व सूचना यंत्रणा योग्य प्रकारे निगा व काळजी न घेतल्यास प्रत्यक्ष दुर्घटनेच्या वेळी या यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरतात व त्यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण करताना अनन्य अडचणींना तोंड द्यावे लागते. आपले सुद्धा यामुळे मोठया प्रमाणात नुकसान होते. आजही कित्येकांना अजूनही माहिती नाही की, उंच इमारतीतील अग्निउद्वाहन (Fire Lift) ही दुर्घटनेच्या वेळी अग्निशमन कर्मचा-यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक असून इमारतीमधील रहिवाशाने जिन्याचा वापर स्वत:च्या सुटकेसाठी करणे आवश्यक आहे.
आजच्या या आधुनिक जगात अद्ययावत अग्निशमन यंत्रणा बिल्डिंग मॉनिटरी सिस्टीमद्वारे सुद्धा नियंत्रणात ठेवू शकतात. परंतु त्यासाठी हवाय आपल्या सामान्यजनांचा अग्निसुरक्षेबाबतच्या वैचारिक पातळीत बदल.