स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन हे तीन सण साजरे केले जातात.
मुंबई- स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन हे तीन सण साजरे केले जातात. प्रजासत्ताक दिनाचा अपवाद सोडला तर स्वातंत्र्य दिन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून मिळालेले महाराष्ट्र राज्य हे मोठया कष्टाने आणि अनेकांचे रक्त सांडून मिळाले आहेत.
हे सहजगत्या मिळालेले नाहीत, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ हुतात्म्यांनी बलदान केले, या बलिदानाची आठवण राज्यातील नवीन पिढीला करून देत अखंड महाराष्ट्राची चळवळ ही प्रत्येकाच्या मनात तेवत ठेवली पाहिजे, यासाठी ‘प्रहार’ लढत राहील असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी केले.
महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेला ५५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यात ‘अखंड महाराष्ट्र चिरायू होवो’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुखांपैकी आचार्य अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै, कॉ. तारा रेड्डी व कॉ. बी. एल. रेड्डी यांचे पुत्र कॉ. प्रकाश रेड्डी यांचा ‘प्रहार’तर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी नारायण राणे बोलत होते.
‘अखंड महाराष्ट्र चिरायू होवो’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याच्या स्थापनेला झालेल्या ५५ वर्षे होत असल्याने ‘प्रहार’ कडून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळील योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येत आहे. यासाठी कणकवली येथे खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, त्याच पार्श्वभूमीवर मुंबई कार्यालयात या अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नारायण राणे म्हणाले की, ज्या महाराष्ट्र दिनाला ५५ वष्रे झाली. त्यासाठी जी चळवळ झाली त्याविषयी आत्ताच्या पिढीला काय वाटते, ते असे सण किती साजरे करतात हे समजून घेण्याची गरज आहे. अनेक लोकांना झोपेतून जागे करून पंधरा ऑगस्ट, महाराष्ट्र दिन आहे, हे सांगावे लागते, मात्र त्यावरही तरूण पिढीला किती विश्वास बसेल हा प्रश्न आहे. मात्र ज्या अखंड महाराष्ट्राच्या चळवळीसाठी १०६ हुतात्मे झाले आणि आठ हजार जण जखमी झाले ही संख्या काही कमी नाही.
ज्यांनी हे सर्व सोसले ते सर्वस्व पणाला लावून आणि महाराष्ट्र अखंड राहण्यासाठी केले. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण पिढीने अखंड महाराष्ट्रासाठी सतत तेवत राहिले पाहिजे. या महाराष्ट्राचे कोणी तुकडे करण्याची भाषा केली तर त्यासाठी रक्त सळसळले पाहिजे. त्यासाठी पेटून उठायला हवे, तरच या हुतात्म्यांना शांती मिळेल, आणि त्यांचे बलिदान सार्थकी लागेल. यामुळे आपण हा महाराष्ट्र अखंड ठेवू आणि या दिवसाचे महत्त्व कमी होता कामा नये ते वाढतचे गेले पाहिजे असेही राणे म्हणाले.
कॉ. प्रकाश रेड्डी आणि अॅड. राजेंद्र पै यांच्या सत्कारासंदर्भात राणे म्हणाले की, सत्कार हा गुणांचा असतो. व्यक्तीचा असतो, तुम्ही महाराष्ट्राच्या संयुक्त लढयातील प्रमुखांचे प्रतिनिधी आहात. तुम्हाला इथे आम्ही नमस्कार केला तर लढयातील त्या महात्म्यांच्या आत्म्यापर्यंत हा पोहचेल यासाठी ‘प्रहार’ने जबाबदारी पार पाडली आहे, असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले.
यावेळी आचार्य अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै यांनी आजोबांसोबतच्या अनेक आठवणी सांगितल्या. हा सत्कार माझा नसून माझ्या आजोबांसोबत या चळवळीत असलेल्या शिरीष पै यांचा असल्याचे सांगितले. तर कॉ. प्रकाश रेड्डी यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्रे यांची लेखणी तर शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे यांचे शाहीरीही तितकीच प्रभावी ठरल्याचे सांगितले.
विदर्भवादी भूमिका मांडणा-यांनी मुख्यमंत्र्यांनी झेंडावंदन करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी बोलत असतात. त्यामुळे अशा मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतरच याविषयी बोलावे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून असे बोलता येणार नाही. यामुळे त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झेंडावंदन करू नये, असे राणे म्हणाले.
चित्रफितीने केला इतिहास जिवंत महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रहारमध्ये ‘अखंड महाराष्ट्र चिरायू होवो’ या कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातील काही अंश आणि आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ने बजावलेल्या भूमिकेची चित्रफितही दाखविण्यात आली. यामुळे त्यावेळचा ऐतिहासिक क्षणाचे चित्र पाहून तो इतिहास नजरेसमोर जागा झाला.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील साक्षीदार आणि ‘प्रहार’चे संपादक मधुकर भावे यांनी त्यावेळी घडलेले अनेक प्रसंग सांगितले. या लढयात अग्रणी असलेले सेनापती बापट, आचार्य अत्रे, कॉ. डांगे, एस. एम. जोशी, उद्धवराव पाटील आदींच्या योगदानाचीही भावे यांनी माहिती देत सर्व इतिहास जागा केला.