‘तबकामध्ये जिथे तेवती निरांजनातील वाती। दिव्यादिव्यांची ज्योत सांगते तुझी नि माझी प्रीती। तुझी नि माझी प्रीती।।’ हे गाणे पूर्वी रेडिओवर सातत्याने गायले गेले की दिवाळी सण जवळ आला याची जाणीव व्हायची. काही गाण्यांची खासियतच असते. गणेशोत्सवात बाल्या डान्सची गाणी, होळी सणाला आणि नारळी पुनवेला कोळी गीते रेडिओवर ऐकायला आली की ते ते सण जवळ आले याची हमखास जाणीव होत असे. पण काळ बदलत गेला, जाणिवाही बदलत गेल्या. जग जवळ येत चालले आणि आपल्या परंपरा आपण विसरत चाललो की काय असे वाटायला लागले. रेडिओची जागा टीव्हीने घेतली. गाण्यांच्या धनिफितीच्या ऐवजी ‘रिअॅलिटी शो’ दिसू लागले. परंपरा बाजूला पडली आणि काळजाच्या कप्प्यातून प्रीत गडप झाली की काय असे वाटायला लागले. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेवली असतानाच तशी गाणी आता ऐकायला येत नाहीत, पण टीव्हीवर जाहिरांतीचा धमाका सुरू झाला आहे.
त्या जाहिराती ख-या असोत की खोटय़ा असोत, लोक मात्र आवर्जून पाहतात आणि दिवाळीला काय खरेदी करायचे याचे आतापासून प्लॅनिंग सुरू करतात. पूर्वी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी व्हायची. पावसाळ्यामुळे चिखलाने माखलेला घराचा परिसर स्वच्छ व्हायचा. घरांच्या भिंती शेणाने किंवा शेण-मातीच्या मिश्रणाने सारवल्या जायच्या. त्यामागे शास्त्र होते. शेणामुळे कीड-जंतू मरून जाऊन आजारापासून रक्षण व्हायचे. त्यावेळी धमाकेदार फटाक्यांचे उत्पादन फार कमी प्रमाणात व्हायचे. जे फटाके वाजायचे त्याचा कोणताही त्रास होत नव्हता. कारण मोकळ्या जागा होत्या. आवाजाच्या लहरी निघून जायच्या. आकाशकंदील उंचावर मोठय़ा डौलाने झुलत राहायचा. दिवाळीच्या सणाचे दिवस संपूच नयेत असे वाटायचे. पण आता मात्र कधी दिवाळी संपतेय असे अनेकांना वाटते. यामागचे कारण म्हणजे मोठय़ा आवाजाचे वाजणारे फटाके. यंदा तर दिवाळीआधीच फटाक्यांपासून होणा-या वायू आणि ध्वनिप्रदूषणावरून राजकीय मतमतांतरांचे फटाके फुटू लागले आहेत.
वाढत्या प्रदूषणामुळे राज्यातील निवासी भागातील फटाके विक्रीवर बंदी तसेच निवासी भागात फटाके विक्री दुकानांना परवाने न देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. खरे तर दिवसेंदिवस वाढत असलेले प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनजागृती करण्याची गरज आहे. पण तेवढी प्रगल्भता त्यांच्याकडे नसल्याने न्यायालयाला हस्तक्षेप करून त्यासंदर्भात आदेश द्यावे लागत आहेत. मात्र न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्याला राजकीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. न्यायालयाच्या आदेशाचा मान राखणारे लोकप्रतिनिधी पक्षप्रमुखाचा अवमान होऊ नये म्हणून आपले मत क्षणात बदलत आहेत. निवासी भागात फटाके विक्रीवर बंदी घातल्यामुळे केवळ हिंदूंच्याच सणांवर बंदी का, असा प्रश्न निर्माण करण्यात येऊ लागला आहे. मुळात फटाक्यांचा अतिरेक हा राजकारणाचा किंवा धर्माचा विषय होऊ शकत नाही, तर वाढत्या प्रदूषणाचा आणि त्यापासून होणा-या गंभीर आजारांचा प्रश्न आहे. प्रदूषण हे धर्म, जात, लिंग आणि वय पाहत नाही. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ब-याचदा आगीच्या घटना घडल्या आहेत.
सणासुदीच्या दिवसांत अनेक झोपडय़ा जळून काही जीवही गेले आहेत. त्यामुळे सण आनंदाने साजरे करायचे असतील तर ते प्रदूषणमुक्त साजरे करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. पण श्वसनाचे विकार बळावले तरी चालतील, बहिरेपणा आला तरी चालेल, घरे जळली तरी चालतील; पण दिवाळीत फटाके वाजलेच पाहिजेत, असे राजकीय बॉम्ब सध्या फोडले जात आहेत. खरे तर दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. मंदपणे तेवणारा दिवा हे या सणाचे प्रतीक आहे. एका दिव्याने दुसरा दिवा लावून सारा परिसर तेजोमय करायचा असतो. म्हणजेच आपल्या ज्ञानाच्या दिव्याने दुस-याच्या मेंदूला ज्ञानप्रकाश देऊन तो तजोमय करायचा असतो. आपल्या हृदयमंदिरातील प्रेमज्योतीने दुस-याच्या मनमंदिरातील प्रेमज्योत प्रदीप्त करायची असते. त्यामुळे अवतीभवतीचे वातावरण मंगलमय होईल. त्याचे प्रतीक म्हणून घरीदारी आणि परिसरात पणत्या प्रज्वलित करायच्या असतात. पणतीच्या मंद प्रकाशात स्वत:च्या चेहरा कसा उजळून जातो ते पाहा. पण दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, हे आज कित्येकांच्या ध्यानीच नाही. याविषयी प्रबोधन गरजेचे आहे. कोणत्याही सणाला उत्सवी स्वरूप आले म्हणजे त्याचा उपद्रव होतो. शेवटी प्रत्येकाने आपले सण आणि उत्सव साजरे करताना याचे भान राखणे आवश्यक आहे.
पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी रोपटे लावण्याच्या खर्चापेक्षा त्याची जाहिरात करण्यावर लाखो-करोडो रुपयांचा खर्च होतो. त्यावेळी सगळी नेतेमंडळी सुस्तावलेली असतात. तीच मंडळी पर्यावरणाचा ऱ्हास करणारे फटाके वाजवा आणि लाखो रुपयांच्या चुराडा करा असे सांगण्यासाठी हिरिरीने पुढाकार घेतात याचेच वैषम्य वाटते. फटाके वाजवा, पण ते आनंद द्विगुणित करणारे फटाके असावेत. परिसराची शोभा वाढवणारे फटाके असावेत, पण त्यालाही मर्यादा असावी. क्षणिक आनंदासाठी हजारो रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा त्यातील काही पैशांतून गोडधोड मिठाई घेऊन आदिवासी पाडय़ांवर जा, झोपडीतील गरिबांकडे जा. एखादा मिठाईचा तुकडा किंवा घरगुती पदार्थ त्यांच्या हातावर ठेवल्यानंतर त्यांच्या चेह-यावर जे हास्य विलसेल तीच एकाच्या हृदयमंदिरातील ज्योतीने दुस-याच्या मनमंदिरातील तेवली जाणारी ज्योत असेल. त्या ज्योतींचा प्रकाश अक्षय आनंद देणारा असेल.