वाढत्या वाहन संख्येमुळे दिवसेंदिवस मुंबई शहरातील वाहतुकीची कोंडी वाढत असताना या शुभ दिनाचे औचित्य साधत नव्याने वाहन खरेदी करणा-यांचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई- वाढत्या वाहन संख्येमुळे दिवसेंदिवस मुंबई शहरातील वाहतुकीची कोंडी वाढत असताना या शुभ दिनाचे औचित्य साधत नव्याने वाहन खरेदी करणा-यांचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
गुढीपाडव्याला वाहन खरेदीत जवळपास १६ टक्क्यांची वाढ झाल्यानंतर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरही मुंबई आणि उपनगरात वाहन खरेदीचा वेग सुसाट असल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई आणि उपनगरातील ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाहन नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये वडाळा आरटीओ कार्यालयात ८४ दुचाकी आणि २८ चारचाकी वाहनांची नोंद करण्यात आली आहे.
यामधून कर स्वरूपात ३ लाख ७८ हजार ९८२ तर, चारचाकी वाहनांच्या नोंदणीमध्ये २९ लाख २५ हजार ५९९ रुपयांचे कर उत्पन्न प्राप्त झाले आहे. याशिवाय ताडदेव आरटीओमध्येही जवळपास २२५ वाहनांची दिवसभरात नोंदणी करण्यात आली. यामध्ये १९५ दुचाकी आणि ३० चारचाकी वाहनांचा समावेश आहे. तसेच अंधेरी आणि बोरिवली प्रादेशिक कार्यालयांमध्येही १५० ते २०० वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.
वर्षातील शुभ दिन समजून अनेक जण या दिवशी वाहन खरेदीला प्राधान्य देतात. यामुळे वाहन खरेदीत दुपटीने वाढ होते. यामध्ये गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा आणि दिवाळी या सणांच्या दिवशी होणारी वाहन खरेदी सर्वाधिक असते. याकरता आरटीओ प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात येते.
खरेदीदारांना वाहने वेळेवर मिळावीत, याकरता आरटीओ कर्मचा-यांकडून अतिरिक्त कामही करण्यात येते. त्यामुळे परिवहन विभागाने मागील काही दिवसांमध्ये नवीन वाहन नोंदणी केल्याने करापोटी अंदाजे २ कोटी रुपये वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.