चांगले दिवस आणण्याचे दिलेले वचन पाळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका कॉँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी केली.
नवी दिल्ली- महागाईसाठी विविध घटकांना जबाबदार धरले जात आहे. चांगले दिवस आणण्याचे दिलेले वचन पाळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठीच मोदी सरकारचा आटापिटा सुरू आहे, अशी टीका कॉँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी केली.
विरोधी पक्षात असताना भ्रष्टाचारामुळे महागाई वाढत असल्याचा जावईशोध भाजपने लावला होता. आता साठेबाजांमुळे महागाई वाढत असल्याचा टीका अर्थमंत्री अरुण जेटली करीत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला कठीण निर्णयाला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत देत आहेत. स्वत: अकार्यक्षमता झाकण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, असे माकन यांनी सांगितले.
राज्य सरकारांची अकार्यक्षमता, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि साठेबाजीमुळे महागाई वाढत होती. मात्र, त्याचा दोष भाजप हा यूपीए सरकारला देत होता, याची आठवण माकन यांनी करून दिली.