डॉक्टर व परिचारिकांची रिक्त पदे, गळके छप्पर, औषध व अन्य सुविधांचा अभाव ही अवस्था आहे अंबरनाथमधील छाया रुग्णालयाची.
अंबरनाथ – डॉक्टर व परिचारिकांची रिक्त पदे, गळके छप्पर, औषध व अन्य सुविधांचा अभाव ही अवस्था आहे अंबरनाथमधील छाया रुग्णालयाची. शहरात नगरपालिकेचे एकमेव असलेले छाया रुग्णालय सध्या व्हेंटिलेटरवर असून शेवटची घटका मोजत आहेत. त्यामुळे या रुग्णालयाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष प्रभाकर नलावडे यांच्या कारकीर्दीत डॉ. बी. जी. छाया रुग्णालय बांधण्यात आले. त्या वेळी दीड रुपयात केसपेपर मिळत होते. तसेच सर्व प्रकारच्या व्याधींवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, पुरेशी औषधे, गोळ्या, श्वानदंश, सर्पदंश आदींसाठी अत्यावश्यक असणारी इंजेक्शन, अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असलेले शस्त्रक्रियागृह, भूलतज्ज्ञ, प्रशस्त प्रसूतीगृह, पुरुष व महिलांसाठी कक्ष, बालरोगतज्ज्ञ, अनुभवी परिचारिका, कक्ष सेवक, ‘क्ष’ किरण तज्ज्ञ, यामुळे अल्पावधीतच हे रुग्णालय तळागाळातल्या गोरगरिबांचे आधारकेंद्र बनले होते.
अंबरनाथच नव्हे तर अंबरनाथ शहरालगत असलेल्या खेडेगावांतील गरीब रुग्णही मोठया संख्येने वैद्यकीय उपचारासाठी छाया रुग्णालयातच येत होते. अल्प मोबदल्यात रक्त, लघवी, थुंकी तपासणी तसेच क्षय रोगावर विनामूल्य मिळणारी औषधे, गोळ्यांचा लाभ दरमहा हजारो रुग्ण घेत होते. मात्र, गेल्या १७ वर्षात सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजप युतीने रुग्णालयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रुग्णालयाची दुर्दशा झाली आहे.
गेल्या १६-१७ वर्षात नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णालयातील अनेक निष्णांत वैद्यकीय अधिकारी रुग्णालय सोडून गेले. जुन्या अनुभवी परिचारिका सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याजागी नवीन भरती झाली नाही. जे दोन-तीन डॉक्टर राहिले त्यांच्यावरच वैद्यकीय सेवेचा भार पडू लागला. मात्र, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्याजागी अद्याप एकाही डॉक्टरला नियमित करण्यात आले नाही. सध्या तुटपुंज्या वेतनावर तीन ते सहा महिन्यांच्या करारावर डॉक्टरांची नियुक्ती केली जात आहे. रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितली जातात. रुग्णालयाचे छप्पर गळत असल्याने बहुतेक सर्वच कक्षात पाणी साचलेले असते. त्यामुळे रुग्णांना व्हरंडयात ठेवावे लागते. डॉक्टरांअभावी मोरीवली व विम्कोनाका परिसरातील ओपीडींना केव्हाच टाळे लागले आहे. रुग्णालयात या गैरसोयींना पाहता आता सर्वसामान्यांनी रुग्णालयाकडे पाठ फिरवली असल्याने रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे.
दरम्यान, नगरपालिकेला रुग्णालय चालवणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर राज्य सरकारने हे रुग्णालय चालवण्यास ताब्यात घ्यावे व त्याला तालुका रुग्णालयाचा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव पालिकेने सरकारकडे पाठवला होता. या प्रस्तावास सरकारने मान्यताही दिली होती. मात्र, आरोग्य खात्याने हा निर्णय रद्द केल्यामुळे नगरपालिकेतर्फेच रुग्णालय चालवले जात आहे.
छाया रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. रुग्णालयातील विविध कक्षांचे दरवाजे, खिडक्या तुटल्या आहेत. छत गळत असल्याने त्याचा नाहक त्रास रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णालयाची दुरुस्ती आणि डागडुजी करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. त्यासाठी येणा-या खर्चास कार्योत्तर मंजुरीही मिळाली आहे. छाया रुग्णालयात नगरपालिकेचे दोन व अन्य सहा डॉक्टर्स कार्यरत आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी आठवडयातून एकदा मानद डॉक्टर म्हणून छाया रुग्णालयात येऊन रुग्णांना तपासावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. भूलतज्ज्ञ व अन्य तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झाल्यास रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी बाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. – दत्ता केंगरे, सभापती, आरोग्य समिती, अंबरनाथ नगरपालिका