दैनंदिन आयुष्यातील ताणतणावामुळे येणारी उदासीनता, आई-वडिलांच्या अपेक्षांचे ओझे, घरातील वातावरण, समाजात वाढत चाललेली जीवघेणी स्पर्धा आणि नात्यांमधील गुंतागुंत यांसारख्या कारणांमुळे पौगंडावस्थेत आत्महत्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे.
दैनंदिन आयुष्यातील ताणतणावामुळे येणारी उदासीनता, आई-वडिलांच्या अपेक्षांचे ओझे, घरातील वातावरण, समाजात वाढत चाललेली जीवघेणी स्पर्धा आणि नात्यांमधील गुंतागुंत यांसारख्या कारणांमुळे पौगंडावस्थेत आत्महत्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. दरम्यान, एकीकडे वाढत्या तणावामुळे आत्महत्या होत असताना आता अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन जीवन संपविण्याच्या घटना सध्या समाजात घडताना दिसून येत आहेत, हे वास्तव आहे. अशीच एक घटना नुकतीच मुंबईत घडली आहे.
‘आपल्या मृत्यूनंतर आपला आत्मा आपल्याला छळणा-यांना नष्ट करेल. जिवंतपणी आपण काही करू शकत नाही. पण, मृत्यूनंतर आत्मा शत्रूला चांगलाच धडा शिकवू शकतो’, असे एक दृश्य हॉरर टीव्ही मालिकेत दाखविण्यात आले होते. या मालिकेतील पात्राला स्वत: मानून एका व्यक्तीने चक्क आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला केईएम रुग्णालयात दाखल केले असता हा प्रकार उघडकीस आला. मात्र, अंधश्रद्धा आणि जादूटोण्याला प्रोत्साहन देणा-या या मालिकांमुळे व्यक्तीचे मानसिक स्वास्थ किती बिघडते, याचा प्रत्यय या प्रकरणावरून येऊ शकतो.
पूर्वी मनोविकार झालेल्या रुग्णाला कुटुंब वा-यावर सोडून देत होते. असे रुग्ण आपले पुढील आयुष्य एखाद्या रुग्णालयात व्यथित करायचे. मात्र, काळ बदलला तरी समाजात राहून मनोरुग्णांना आजही उपेक्षित जीवन जगावे लागते. मुळात मनोरुग्णालय बंद व्हायला हवी होती. परंतु, रुग्णांची वाढती संख्या पाहता अद्याप ती बंद झालेली नाहीत किंवा भविष्यात होणारही नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कारण, समाजात सध्या सुरू असलेल्या विविध घटना आणि स्पर्धात्मक युगात उत्तम नोकरी, स्वत:चे घर आणि उच्च राहणीमान या सा-या स्वप्नांमागे धावताना व्यक्ती थकतात, त्यातून आलेल्या नैराश्यातून कंटाळून ते आपली जीवनयात्रा संपवतात.
परंतु, आता अंधश्रद्धेमुळे आत्महत्या करण्याचा प्रकारच समोर आला आहे. मुळात, टीव्ही मालिकांबाबत समाजावर फार मोठा पगडा आहे. मालिकांमध्ये जे काही दाखवले जाते ते सत्यच आहे, असे लोक मानू लागतात. परंतु, यात कुठल्याही प्रकारचे गैर नसून हा मानवी स्वभावच आहे. स्वभावाला औषध नसतं असं म्हणतात तेच खरं. पण व्यक्तीचा स्वभाव आणि मानसिक आजार यात मोठा फरक आहे. मालिका पाहून त्यात घडणा-या काल्पनिक गोष्टींबाबत सतत विचार करून त्यावर चर्चा करणे आणि या गोष्टींचा अतिविचार करून त्याप्रमाणे आचरण करणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
व्यक्तींना मानसिक आजार असल्यास अशाप्रकारच्या कृती घडतात. मुळात अनेकदा आपल्या आजूबाजूला असलेला व्यक्ती हा मानसिक रुग्ण आहे, हे कळून येत नाही. इतकेच नाहीतर रुग्णांना सुद्धा याची काहीच जाणीव नसते. कारण, व्यक्तीला एखादा आजार झाल्यास प्रथम त्या आजाराची लक्षणं दिसून येतात. त्यानंतर त्रास जाणवू लागल्यानंतर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. पण, मानसिक आजारामुळे कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळून येत नसल्याने हा आजार झाल्याचे सहसा कळून येत नाही. विशेषत: ही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी अन्य लोकांप्रमाणे वर्तन करते. समाजात घडणा-या प्रत्येक घटनांची त्यांना उत्तम जाण असते. त्यामुळे या व्यक्ती सहसा प्रकाशझोतात येत नाहीत.
साधारणत: मनोविकाराचे निदान करण्यासाठी कुठल्याही प्रकारची तपासणी नसते, मानसोपचार तज्ज्ञ रुग्णाच्या स्थितीचा अभ्यास करून निदान करतात. मानसिक ताण-तणाव कमी करणे व त्या व्यक्तीला सतत कामात व्यस्त ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा आजार काही टक्के कमी होण्यास मदत होते. रिकामे बसल्यास मनात विविध विचार येऊन हा आजार बळावण्याची दाट शक्यता असते. रुग्णाच्या वागणुकीमुळे त्यांच्या घरातील कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो. पण, इतरांनी त्यांना समजून घेणे गरजेचे असते.
मानसिक आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे या आजाराबाबत समाजात जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषत: समुपदेशनाच्या माध्यमातून रुग्णावर उपचार करता येणे शक्य होते. या उपचारपद्धतीमुळे रुग्णांमध्ये पूर्वीची हिम्मत आणि कल्पनाशक्ती पुन्हा प्राप्त होते. इतकेच नाहीतर समाजातील व्यक्तींनी मनोविकार झालेल्या रुग्णांना आपुलकीची साथ दिल्यास मनोरुग्णालयाची आवश्यकता भासणार नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.