‘नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ या घोषवाक्याने विविध स्तरावर नेत्रदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती पसरविण्याचे काम करण्यात येत आहे.
मुंबई- ‘नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ या घोषवाक्याने विविध स्तरावर नेत्रदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती पसरविण्याचे काम करण्यात येत आहे. परंतु, नेत्रदानाविषयीचे समज गैरसमज आणि जागरूकतेच्या अभावामुळे नेत्रदानाच्या प्रमाणात फारशी सुधारणा झालेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
कारण, अज्ञान, अंधश्रद्धा आणि निरक्षरता या कारणांमुळे नेत्रदानाचे प्रमाण अजूनही एक टक्क्यांच्या खालीच आहे. सध्या महाराष्ट्रात दोन लाख अंधबांधवांसाठी वर्षाला केवळ सात हजार नेत्र नेत्रदानातून उपलब्ध होत आहेत. दरवर्षी दोन लाख नेत्रगोलकांची गरज असताना नेत्रदानाचा हा आकडा खूपच नगण्य आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अंधत्वाचे तीन प्रकार आहेत. रेटिना, ऑप्टिक नस आणि कॉर्निया. रेटिना आणि ऑप्टिक नस हे दोन्ही प्रकार कायम अंधत्वाचे असतात. कॉर्निया असलेल्या व्यक्तीचे अंधत्व शस्त्रक्रियेद्वारे दूर करता येऊ शकते. संपूर्ण भारतात १ कोटी सहा लाख लोक अंध असून त्यापैकी २१ लाख लोकांना कॉर्नियाची आवश्यकता असते. तर महाराष्ट्रात दोन लाख अंधांचा यात समावेश आहे.
[poll id=”1076″]
इतकेच नाहीतर देशभरात १ कोटी २० लाख लोक दृष्टिबाधित असून, दरवर्षी पाच लाखांवर नेत्रगोलकांची गरज आहे. तर प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षात देशासमोर १ लाख ७० हजार उद्दिष्टे असताना प्रत्यक्षात १ लाख ४३ हजार ७२३ नेत्रगोलक संकलित करण्यात आले आहेत.
देशात एक हजार व्यक्तींमागे केवळ १० व्यक्तींचे नेत्रदान केले जाते. परिणामी अनेक दृष्टिबाधित व्यक्ती अद्यापही डोळ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. मुळात, देशात नेत्रदानाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे एवढया मोठया संख्येत असलेल्या लोकांना दृष्टी मिळणे कठीण आहे.
विशेषत: कोणत्याही वयोगटातील व्यक्ती नेत्रदान करू शकतो. मधुमेह, रक्तदाब असलेले किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीलाही नेत्रदान करता येते. याव्यतिरिक्त एचआयव्ही बाधित, कर्करोग आणि क्षयरोग झालेल्या रुग्णांचे डोळे नेत्रदानासाठी घेतले जात नाहीत. डोळे घेत असताना ते मृत्यूनंतर सहा तासांनी घेतले जातात.
मृत झालेल्या व्यक्तीच्या ठिकाणी डॉक्टर आल्यानंतर डोळे काढून न घेता केवळ बबुळे काढून घेण्यात येतात. मृत्यूनंतर लगेच बबुळ काढून घेतल्यास ते व्यवस्थित राहतात. त्यानंतर तीन दिवसांनंतर ज्यांना गरज आहे अशांवर त्यांचे प्रत्यारोपण केले जाते, अशी माहिती नेत्रतज्ज्ञांनी दिली.
नेत्रदानाबाबत गैरसमज दूर करा
नेत्रदान केल्यास स्वर्गात जागा मिळत नाही. इतकेच नाहीतर नेत्रदान केल्यास पुर्नजन्म झाल्यास शरीरातील हा अवयव मिळत नाही. याशिवाय डोळे बदलल्यास व्यक्तीचा स्वभावही बदलतो, असा गैरसमज लोकांमध्ये आहे. मात्र, प्रत्यक्षात असे काहीही होत नाही. या सर्व गैरसमजुतींना आळा घालून नेत्रदान करण्यासाठी लोकांनी पुढे यावे, असे मत जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले आहे.
याशिवाय नेत्रदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तींना पैशाच्या स्वरुपात मदत केली जाते. डोळा काढल्यानंतर येणारा खर्चही सरकारच करते. इतकेच नाहीतर नेत्रदान करणा-यांचा सरकारतर्फे सत्कारही करण्यात येतो, असेही डॉ. लहाने यांनी सांगितले.