आमदार नितेश राणे यांचा घणाघात
कणकवली (प्रतिनिधी) : ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे पाकिस्तानचे ‘एजंट’ झालेले आहेत. पाकिस्तानमधून येणारे ड्रग्ज मुंबईसह महाराष्ट्रात पुरविणारे जे ड्रग्ज माफिया आहेत, त्यांचे ते ब्रँड अॅम्बेसेडर आहेत, अशी जोरदार टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवलीत प्रहार भवन येथे भाजप प्रदेशच्या वतीने आयोजित रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील पत्रकार परिषदेत आ. नितेश राणे यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, भाजप कृषी मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.
एनसीबीने नवाब मलिक यांच्या जावयाला अशाच एका प्रकरणात अटक केली होती, म्हणून ते या खात्याची आणि अधिकाऱ्यांची बदनामी करत आहेत.
मात्र, स्वतःला मराठी माणसांची संघटना म्हणवून घेताना शिवसेनेला लाज वाटली पाहिजे. अधिकारी वानखेडे कोण आहेत? ते मराठी नाहीत काय? तुमचा नवाब मलिक मराठी माणसाला रोज चिरडतो, त्याला धमकी देतो, तुम्ही काहीच बोलणार नाही. शिवसेनेची मराठी अस्मिता आता कुठे गेली? असा संतप्त सवाल आ.नितेश राणे यांनी केला.
नवाब मलिक पाठराखण करत असल्याने राज्यातील ड्रग्ज माफिया शांत झोपत आहेत. राज्याची भावी पिढी बरबाद करण्यात मंत्री नवाब मलिक यांची महत्वाची भूमिका आहे, असे सांगतानाच, शिवसेना खा. संजय राऊत यांनी मराठी अस्मिता, हिंदुत्व हिंमत असेल तर मंत्री नवाब मलिक यांना शिकवावे, असे त्यांनी सुनावले.