मुंबई : भाषणासाठी कोणाला कोणावरचा ‘राग’ लागतो, अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा ‘वाघ’ लागतो, असे ट्विट करत आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
दसरा मेळाव्यानंतर विरोधकांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंवर टीका करायला सुरूवात केली आहे. भाषण वाचून दाखविल्याने मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा साधला.
अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा ‘वाघ’ लागतो, असे म्हणतानाच मजा नाय राव बीकेसीत, बीकेसीत सुरू होते केबीसी, खोके असे म्हणत आमदार राजू पाटील यांनी शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
तर नुसतीच “उणी-धुणी” “नळ” आणि “भांडण” विचारही नाही आणि सोनंही नाही, असे वाक्य ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. तर बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांची सभा सुरू होण्यापूर्वी ही टोमणेसभा असणार आहे, असा टोला मनसेचे प्रवक्ते गजनान काळे यांनी ट्विट करत लगावला होता.