आई आवडते की बाबा…

Share
  • आनंदी पालकत्व : डॉ. स्वाती गानू

मूल दोघांपैकी जेव्हा एकाच पालकाबद्दल पझेसिव्ह असतं, तेव्हा अनेक अडचणींना सुरुवात होते. त्याला प्रत्येक गोष्ट करताना आई किंवा बाबा नाहीतर आईबरोबरच किंवा बाबांबरोबरच करायची असते. प्रत्येक उपक्रमासाठी त्याला ठरावीक पालकच हवे असतात. त्यामुळे अभिमान बाजूला ठेऊन मुले पालकांसोबत अधिक वेळ कसा घालवतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलं आणि पालकांमध्ये मैत्रीचे नाते तयार होईल.

लहानपणी आपल्याला सगळ्यांनाच बहुतेक वेळा हा प्रश्न विचारला जातो की तुला कोण आवडतात? मूल थोडं भांबावतं. काय उत्तर द्यावं ते त्याला कळत नाही. म्हणजेच दोघांपैकी जास्त कोण आवडतं? आई की बाबा? मूल त्याला हवं ते उत्तर देतं. पालकांपैकी जो जास्त लाड करतो म्हणजेच जे हवं ते करू देतो, विकत घेऊन देतो. त्याचंच नाव मूल उत्तरादाखल सांगतं. मूल ज्याचं नाव सांगतं तेव्हा पालक खूश होतो. इथपर्यंत सगळं ठीक असतं पण जेव्हा मूल दोघांपैकी फक्त एकाच पालकाबद्दल पझेसिव्ह असतं, त्याला प्रत्येक गोष्ट आई किंवा बाबा नाहीतर आईबरोबरच किंवा बाबांबरोबरच करायची असते. प्रत्येक उपक्रमासाठी त्याला ठरावीक पालकच हवे असतील, तर मग अडचणींना सुरुवात होते. बहुतेक वेळेस मुलं आपल्या खेळण्यांबाबत, मित्र-मैत्रिणींबद्दल, खाण्यापिण्याच्या पदार्थांबाबत खूप पझेसिव्ह असतात. त्यांना आपली खेळणी दुसऱ्या कुणाला देणं, अगदी भावंडाला, मित्रांना देणंही पटत नाही. खेळताना, बर्थ डे पार्टीला आवडत्या मित्र-मैत्रिणींबरोबरच सेलिब्रेशन करायचं असतं. काही उपक्रमांसाठी आईच लागते, तर काही वेळेस बाबाच असणं आवश्यक ठरतं. मात्र अशी काही मुलं असतात ज्यांना फक्त बाबाच हवा असतो किंवा फक्त आईच हवी असते. ही मुलं आपल्या आवडत्या पालकाला कोणाहीबरोबर शेअर करणं पसंत करत नाहीत. भयंकर हट्टी बनतात. कधी कधी तर चक्क तोंडावर म्हणतात तू नको करूस. मला तुझ्या हातचं आवडत नाही. तू नकोस मला बाबाच बूट घालेल, तुम्ही म्हणताही की, बाबाला काम आहे तो नाही आता इथे येऊ शकत. पण मूल ऐकत नाही. तुम्हाला ढकलून बूट घेऊन बाबाकडे पळत जातं. हट्टच करतं. तुम्हाला प्रश्नही पडतो. एवढं काय स्पेशल आहे बाबात जे माझ्यात नाही. अशा विचारांनी तुम्ही पछाडून जाता. दिवसभर मी तुझ्या मागेमागे फिरते आणि तुला मात्र मी नको, तर बाबा हवाय. मन घायाळ होतं.

अशा वेळी दुसऱ्या पालकांसमोर फार पंचाईत होते. आपण काय प्रतिक्रिया द्यावी, काय निर्णय घ्यावा हे कळत नाही. मग मन दुखावतं. त्यात घराबाहेर, लोकांसमोर असे प्रसंग घडले आणि वारंवार असं व्हायला लागलं की, संकोचल्यासारखं आणि लाजल्यासारखं व्हायला लागतं. आपलंच मूल आपल्यापैकी एकाचीच निवड करतं. तोच किंवा तीच हवी म्हणतं, पूर्णपणे एकाच्याच स्वाधीन होतं. अगदी आई जरी बाबांशी बोलत असली तरी पझेसिव्ह होतं. हे पटणं किंवा मनाला सांगणं सोपं नसतं.
जेव्हा मूल तुमचा हात सोडून दुसऱ्या पालकांकडे जातं तेव्हा हृदय अक्षरशः पिळवटून जातं, मन मिटून जातं. काय कारणं असू शकतात ह्याची.

●कधी कधी आई-वडील एकमेकांपासून नोकरीनिमित्ताने लांब राहत असले, अधूनमधूनच भेटी होत असतील, नवरा-बायको दोघांपैकी एकजण आजारपणाने अंथरूणाला खिळलेले असतील, आई-वडिलांचा डिव्होर्स झाला असेल त्यामुळे एका पालकावरच मुलं अवलंबून असतात.

●जेव्हा दोन मुलं असतात आणि दोघांपैकी एकजण मोठ्याला तर दुसरा लहान मुलाला सांभाळत असल्याने मुलाला विशिष्ट पालकाचीच सवय लागते.

●काहीवेळेस तर काहीच मोठं कारण नसतं पण मूल त्या त्या पालकांबरोबर कम्फर्टेबल असतं म्हणून त्याला तोच पालक हवा असतो.

●कारण काहीही असो आपल्याला मुलांकडून असं मिळणारं रिजेक्शन हे दुःखदायी असतं. काय करता येईल अशा परिस्थितीत –

मुलांच्या अशा वागण्याने वाईट वाटणं स्वाभाविकच आहे पण म्हणून जोरजोराने अश्रू गाळून रडणं किंवा रागारागात अपशब्द बोलणं या भावना मुलांसमोर व्यक्त करणं उचित नाही. कारण एखाद्या मोठ्या माणसासमोर असं व्यक्त करणं योग्य ठरेल पण लहान मुलांशी वागताना भावनांचं व्यवस्थापन करायलाच हवं. असं असलं तरी तुझ्या अशा वागण्याने, हट्ट करण्यामुळे मला खूप वाईट वाटलं, सॅड फील झालंय हे जरूर सांगा.

●नीट विचार करा की तुमचं आणि तुमच्या मुलाचं नातं स्ट्रेसफुल आहे का? जर असेल तर स्वतःला थोडा वेळ द्या. तुमच्यातलं बॉन्डिग मजबूत करा. मुलाची आवड-निवड, त्याच्याशी संवाद, त्यांच्याबरोबर वेळ घालवा. रोज मुलांबरोबर क्वालिटी टाईम घालवा. तुम्हाला आपल्या मुलांसाठी खेळासोबतच नवीन उपक्रम खेळण्यासाठी देता येतील. मुलांच्या भावना समजून घ्या. त्यांच्याशी एम्पॅथीने वागा.

एखाद्या वेळी मूल हटूनच बसलं असेल की मला बाबाच हवा, त्याच्याच हातून मी हे करणार आणि तुमचा पार्टनर जर त्यावेळी तिथे उपस्थित नसतील, तर तुम्ही न रागावता असं म्हणू शकता की मला कळतंय की तुला काय वाटतंय, आय विश बाबा इथे असता. पण तो नाहीय आणि तुला माझ्याकडूनच हे करून घ्यावं लागणार आहे. अशा मर्यादा घालाव्यात.

मुलांशी छान नातं जुळावं यासाठी काय वेगळं करता येईल? जसं की तिला आवडणारं गाणं म्हणणं, तिचा आवडता गेम खेळणं, कुकिंग, मस्ती, टीव्ही शोज पाहणं असं काही ज्यामुळे हा ताण कमी होईल.

● स्वतःशी प्रामाणिक राहू या. आपल्या पार्टनरचा राग-राग करणं किंवा मुलाला टाकून बोलणं का, तर हाच/हीच का हवा/हवी असते. याला असा निगेटिव्ह विचार नको करू या. ही एक फेज आहे. तात्पुरत्या वेळाकरता हे आहे. कायमचं नाही. तुमच्या जोडीदाराशी या विषयावर बोला. चर्चा करून तुमच्या दोघांची स्ट्रॅटेजी ठरवा. इतकं करूनही मार्ग निघत नसेल, हेल्पलेस, कन्फ्यूजड वाटत असेल तर प्रोफेशनल मदत घ्यायला हवी.

● मुलांशी याबाबत डील करताना त्याला हे सांगा की तू बाबाला खूप आवडतोस म्हणून तुला सगळं त्याच्याकडून किंवा त्याच्याबरोबरच करायचं आहे हे छान आहे. पण आई, मावशी आणि इतर लोकही तुझ्यावर तितकंच प्रेम करतात. मूल तुम्हाला नाॅन प्रेफरड पॅरेन्ट मानत असलं तरी मुलाशी एम्पॅथीने बोलून, वागून त्याची डिपेन्डनसी कमी करता येऊ शकेल.

● एक मजेचा खेळ खेळता येईल मुलांबरोबर. तुला आई आणि बाबा दोघांच्या कोणत्या गोष्टी आवडतात त्याची लिस्ट करा. दोघांच्या कोणकोणत्या गोष्टी सेम आहेत आणि कोणत्या गोष्टींमध्ये फरक आहे. त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. शोध घ्या अशा कोणत्या क्वालिटीज आहेत ज्यामुळे दुसरा पालक युनिक ठरतोय. अशी कोणती शक्तिस्थानं आहेत ज्यामुळे मूल त्या पालकांबरोबर जास्त आनंदी आणि कम्फर्टेबल राहतं. त्यावर तुम्हाला काम करता येईल.

●एक काळजी नक्कीच घ्यायला हवी. जर मूल तुम्हाला प्रेफरड पॅरेन्ट मानत असेल तर तुम्ही खूश राहता, समाधानी असता. मनातून फार आनंदित होता पण त्याचवेळी दुसरा पालक मात्र मुलाने त्याला आपलं मानावं, जवळ यावं, त्याला आपण हवं असावं यासाठी झगडत असतो. मग त्याला तुमच्याबद्दल जेलसी वाटू शकते. तो दुखावू शकतो. फ्रस्ट्रेटेड होऊ शकतो हे विसरू नका. तुमचा अभिमान बाजूला ठेवा आणि तुम्ही जाणीवपूर्वक असा प्रयत्न करा की, मुलाने दुसऱ्या पालकांबरोबर अधिक वेळ घालवावा. त्यांना दोघांना मोकळेपणाने त्यांच्या भावनांविषयी बोलता यावं अशा सिच्युएशन्स क्रिएट करा. त्यामुळे त्या दोघांमध्ये नातं तयार होईल आणि हा गुंतागुंतीचा प्रश्न थोडा सोपा व्हायला लागेल.

Tags: Parenting

Recent Posts

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा उद्रेक

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे दोनशे रुपये लिटर दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ, जीवनावश्यक वस्तूंचा…

13 seconds ago

IPL 2024 Final: चेन्नईमध्ये होणार फायनल, तिकीटांची विक्री सुरू, कितीचे आहे स्वस्त तिकीट

मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…

2 hours ago

Health: दररोज आवळ्याचे सेवन करण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे

मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…

3 hours ago

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…

4 hours ago

IPL 2024: चेन्नई बाहेर जाण्याचे दु:ख पचवू शकला नाही अंबाती, कमेंट्री बॉक्समध्ये आले रडू

मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…

5 hours ago

मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…

6 hours ago