अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. याशिवाय पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी ७ कोटी ६१ लाख ५८ हजार रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करुन तो मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठवला आहे. या आराखड्यात १ हजार ३२८ गावे व वाड्यांचा समावेश आहे. येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
रायगड जिल्ह्यातील काही गावांना एप्रिल, मे महिन्यात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात विहिरी खोल करणे, त्यामधील गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणे, नवीन विंधन विहीर खोदणे, विंधन विहीरीची दुरुस्ती, नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करणे या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १ हजार ३२८ गावे वाड्यांवर संभाव्य पाणीटंचाईच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी याबाबत अधिक माहिती देताना म्हटले, संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाण्याचा वापर जपून करावा, अपव्यय करू नये, पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्त्रोतांव्यतिरिक्त परिसरातील इतर उपलब्ध स्त्रोतांमधील पाण्याचा दैनंदिन वापरासाठी वापर करावा, पाणी स्त्रोत दूषित होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी, कुठे पाणीपुरवठा पाईपलाइन फुटली असल्यास निदर्शनास आणून द्यावी.