Saturday, May 10, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

भारताच्या हल्ल्यात अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या विमानतळांची वाताहात

भारताच्या हल्ल्यात अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या विमानतळांची वाताहात नवी दिल्ली : पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानच्या विमानतळांवर थेट हवाई हल्ला केला. या हल्ल्यामुळे अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या तीन विमानतळांची पुरती वाताहात झाली. आणखी एका विमानतळावरही स्फोट झाल्याचे वृत्त आहे. पण त्याबाबतचे तपशील अद्याप हाती आलेले नाहीत. पाकिस्तानने शुक्रवार ९ मे रोजी रात्री जम्मू काश्मीरमध्ये फक्त जम्मू तसेच पंजाब आणि राजस्थानमध्ये अशा एकूण २६ ठिकाणी हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त सीमेपलिकडून पाकिस्तानने नागरी वस्त्यांना आणि सैन्याच्या चौकी - पहाऱ्यांना लक्ष्य करुन गोळीबार आणि तोफांचा मारा सुरू केला. पाकिस्तानच्या हल्ल्यात भारताचे मर्यादीत नुकसान झाले. भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचे अनेक हवाई हल्ले निकामी केले. पण काही हवाई हल्ल्यांमुळे निवडक ठिकाणी घरांची आणि इमारतींची पडझड झाली. काही नागरिक जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यांना उत्तर म्हणून भारताने हवाई हल्ले केले. तसेच सीमेवर पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली. भारताने सीमेच्या जवळचे अतिरेक्यांचे लाँच पँड तसेच सीमेजवळच्या भागातील ड्रोनचे लाँच पॅड नष्ट केले. यानंतर भारताने इस्लामाबादपासून जेमतेम १० किमी अंतरावर, रावळपिंडी जवळच्या गॅरिसन शहरामध्ये असलेला नूर खान हवाई तळ, चकवालचा मुरिद हवाई तळ आणि पूर्व पंजाब प्रांतातील झांग जिल्ह्यातील रफीकी हवाई तळ यांच्यासह सैन्याच्या वापरात असलेल्या आणखी एका हवाई तळाला लक्ष्य केले. या सर्व विमानतळांवरुन स्फोटांचे मोठे आवाज ऐकू येऊ लागले. स्फोट सुरू होताच पाकिस्तानने देशातील नागरी विमान वाहतूक बंद केल्याचे जाहीर केले. यानंतर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याच्या कारवाया एकदम थंडावल्या. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे तर रावळपिंडीत पाकिस्तानच्या लष्कराचे मुख्यालय आहे. अस्तित्वात आल्यापासून पाकिस्तानवर दीर्घकाळ प्रत्य अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानच्या सैन्याचेच वर्चस्व राहिले आहे. सैन्याचे अधिकारी रावळपिंडीतून देशावर राज्य करण्यासाठी कायम चर्चेत राहिले आहेत. हा सगळी पार्श्वभूमी असल्यामुळे इस्लामाबादपासून जेमतेम १० किमी अंतरावर, रावळपिंडी जवळच्या गॅरिसन शहरामध्ये असलेल्या नूर खान हवाई तळावर लागोपाठ स्फोट सुरू होताच पाकिस्तानच्या सैन्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चकवालचा मुरिद हवाई तळ आणि पूर्व पंजाब प्रांतातील झांग जिल्ह्यातील रफीकी हवाई तळ यांचीही वाताहात झाली आहे. यामुळे पाकिस्तानच्या हवाई दलाच्या कारवायांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने भारताच्या क्षेपणास्त्र आणि रॉकेटच्या साठ्याला नष्ट करण्यासाठी फतेह क्षेपणास्त्रांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने पाकिस्तानची क्षेपणास्त्र निकामी केली. पाकिस्तानचे अनेक ड्रोन, रॉकेट हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले भारताने निकामी केले. या व्यतिरिक्त शनिवारी मध्यरात्री झालेल्या लढाई दरम्यान भारताने पाकिस्तानची काही लढाऊ विमानं पाडल्याचं वृत्त आहे. या विमानांच्या वैमानिकांनी भारतातच पॅराशूटच्या मदतीने उतरण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस सध्या वैमानिकांचा शोध घेत आहेत. दिसताक्षणी पाकिस्तानच्या वैमानिकांना अटक करा आणि त्यांनी प्रतिहल्ला केल्यास त्यांच्यावर गोळीबार करा, असे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्या रात्रभर झालेल्या संघर्षाची माहिती देण्यासाठी सकाळी साडेदहा वाजता नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेतून अधिकृत माहिती दिली जाणार आहे. सध्या पाकिस्तानच्या निकामी केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. यातील निवडक पुरावे पत्रकार परिषदेवेळी दाखवले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने चीनची हवाई संरक्षण यंत्रणा, तुर्कस्तानचे ड्रोन आणि इराणचे फतेह क्षेपणास्त्र या व्यतिरिक्त चीन आणि अमेरिकेची लढाऊ विमानं आणि परदेशातून आयात केलेली रॉकेट, तोफगोळे आदी दारुगोळा वापरुन भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने ७ मे पासून आतापर्यंत बहुसंख्य हल्ले पुरते निकामी केले. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या तळांचे आणि लाँच पॅडचे तसेच पाकिस्तानच्या विमानळांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Comments
Add Comment