
दिसपूर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी २६ हिंदूंच्या ‘टार्गेट किलींग’नंतर देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच आसाममध्ये पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या ३७ देशद्रोहींना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटरवर (एक्स) याबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशद्रोह्यांवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत एकूण ३७ देशद्रोहींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सर्व देशद्रोह्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पहलगाम हल्ल्यानंतर काही लोक सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून पाकिस्तानला पाठिंबा देणारी विधाने करत होते.या विधानांना गांभीर्याने घेत, आसाम पोलिसांनी तपास सुरू केला आणि आतापर्यंत राज्याच्या विविध भागातून ३७ जणांना अटक केली आहे. आसाम सरकार कोणतेही देशविरोधी वर्तन सहन करणार नाही. देशाच्या एकता आणि अखंडतेशी छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच कुणीही देशविरोधी टिप्पणी किंवा कृती केल्याचे आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. राज्यात शांतता आणि सुरक्षा राखली जावी आणि कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी विचारांना प्रोत्साहन दिले जाऊ नये, असा सरकारचा हेतू असल्याचेही त्यांनी ठणकावले आहे.