
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची कडक भूमिका
नवी दिल्ली: "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली तुम्हाला जे हवे आहे तेच होईल..." असे पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर संरक्षक मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी मोठा इशारा दिला आहे. दिल्लीत आयोजित संस्कृती जागरण महोत्सवात त्यांनी हे मोठं वक्तव्य केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) लवकरच योग्य उत्तर दिलं जाणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर यांनी कडक भूमिका घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशवासीयांच्या इच्छा निश्चितच पूर्ण होतील असे म्हटले.
"तुम्ही पंतप्रधानांना चांगले ओळखता, त्यांची कार्यशैली आणि दृढनिश्चय आपल्या सर्वांनाच परिचित आहे. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला जे हवे आहे ते पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली नक्कीच होईल." असे राजनाथ सिंह यांनी जनतेला उद्देशून म्हंटलं.
दहशतवादी हल्ल्यांना योग्य उत्तर मिळेल
देशाच्या सीमांचे रक्षण करणे आणि दहशतवादी हल्ल्यांना योग्य उत्तर देणे ही संरक्षणमंत्री म्हणून आपली जबाबदारी असल्याचे सांगताना, "देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणे आणि देशावर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्या प्रत्येकाला योग्य उत्तर देणे हे माझे कर्तव्य असल्याचं ते पुढे म्हणाले.
भारतीय सैनिकांबरोबरच देशातील संतांना देखील दिले महत्व
राजनाथ सिंह यांनी, भारतीय संस्कृती आणि अध्यात्मावर देखील भर दिला आहे. "आपले शूर सैनिक भारताच्या भौतिक सीमांचे रक्षण करतात, तर आपले संत आणि ऋषी देशाचे अध्यात्म जपतात. एकीकडे सैनिक युद्धभूमीवर लढतात, तर दुसरीकडे संत युद्धभूमीवर संघर्ष करतात." असे ते पुढे म्हणाले.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कडक भूमिका
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी गट द रेझिस्टन्स फ्रंटने घेतली होती. या हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक पावले उचलली, ज्यात सिंधू जल करार निलंबित करणे, अटारी-वाघा सीमा क्रॉसिंग बंद करणे, पाकिस्तानी राजदूतांना बाहेर काढणे आणि पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद करणे यांचा समावेश होता.
पंतप्रधान मोदींनी सैन्याला प्रत्युत्तर देण्याची पूर्ण मोकळीक दिली आहे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सूचित केले आहे की दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना लवकरच योग्य उत्तर मिळेल.