Tuesday, May 6, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

'मोदींनी कधी निवृत्त व्हावे हे जनता ठरवते, सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही'

'मोदींनी कधी निवृत्त व्हावे हे जनता ठरवते, सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही'

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला संजय राऊतांवर निशाणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीवर भाष्य करताना संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार असल्याचे म्हटले. त्यानंतर भाजपाकडून संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबाबत केलेल्या विधानावर भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'मोदींनी कधी निवृत्त व्हावे हे जनता ठरवते, सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही,' अशा शब्दांत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट करत संजय राऊत यांच्या वक्तव्याला राजकीय स्टंटबाजी असल्याचे म्हटले. '७५ वर्षांनंतर नरेंद्र मोदींनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही. भाजपाच्या अधिकृत धोरणातही असे काही नमूद केलेले नाही. तसेच भारतीय संविधानातही अशा प्रकारचा कोणताही ठराव नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले.

२०४७ पर्यंत मोदींचे नेतृत्व कायम राहील

"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०४७ पर्यंत भारत विकसित करण्याचा संकल्प केला आहे आणि तो त्यांच्या नेतृत्वाखालीच पूर्ण होईल," असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपा नेत्यांचे हे विधान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष आणखी तीव्र करण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी मोदींच्या निवृत्तीबाबत केलेल्या विधानानंतर भाजपाकडून जोरदार प्रतिउत्तर येत असून यावर शिवसेनेची अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे.

सर्वज्ञानी संजय राऊत म्हणजेच रडत रौत म्हणजे उबाठासेनेचा पोपट झालाय. आता या उबाठांनी पाळलेल्या पोपटाने भाकड भविष्य सांगायला सुरूवात केली आहे. एकच सांगणे आहे या स्वयं घोषित विश्वगुरूने स्वतःच्या घराकडे आधी लक्ष द्यावे. भारतीय जनता पार्टी, प्रधानमंत्री मोदीजी वगैरेंवर बोलण्याची एकतर त्यांची कुवत नाही, आणि तुमच्या विश्लेषणाची आमच्या पक्षाला गरजही नाही. भारतीय जनता पार्टीचा पुढचा वारसदार वगैरेच्या गोष्टी बोलण्यापेक्षा जरा स्वतःच्या पक्षाला माफ करा गटाला पडलेले खिंडार सांभाळा. जरा गटप्रमुख असलेल्या उबाठांना तर आपण विधानपरिषद आमदार आहोत याचा देखील विसर पडलाय. त्यांना त्यांच्या कामाची आठवण करून द्या, नाहीतर काही वर्षांत तुमच्या पक्षाचे अस्तित्व देखील उरणार नाही. - आ. चित्रा वाघ, भाजपा, महिला प्रदेशाध्यक्ष

Comments
Add Comment