Tuesday, May 6, 2025

श्रध्दा-संस्कृतीसाप्ताहिक

स्वामींचा उपासना मार्ग

स्वामींचा उपासना मार्ग

समर्थ कृपा - विलास खानोलकर

विश्वनाथ स्वामींचा आधुनिक भक्त होता. पहाटे पूजा करताना स्वामींना स्वप्नातच विचारतो, भक्तांनी धावपळीत उपासना कशी करावी! स्वामी त्याला सांगतात मनशांत ठेवून मी सांगतो त्याप्रमाणे कर म्हणजे उपासना परीपूर्ण होईल व मनशांत लाभेल. आयुष्यात जन्माला आल्यानंतर माणसाने एकदा तरी साधना, उपासना करून पाहावी. त्याचा अनुभव घेऊन पाहावा, मग ती कोणत्याही देवतेची असू द्या. पण एकदा तरी हा अनुभव नक्कीच घ्या, तुमचे भले होईल, कल्याण होईल, इच्छित प्राप्ती होईल.

कुठलाही सर्वसामान्य माणूस हे करू शकतो. एकदा त्याने मनाचा निग्रह केला की काहीही अशक्य नाही फक्त प्रचिती ज्याची त्याला त्याच्या प्रारब्धानुसार येते. म्हणजे कोणाला लवकर ३ महिन्यांनी, कोणाला ६ महिन्यांनी, कोणाला ९ महिन्यांनी, तर कोणाला जास्तही वेळ लागू शकतो.

प्रारब्ध फारच कठीण, खराब असेल तरच असे होते. मग अशावेळी सत्कर्म, दान करण्यास सुरुवात करावी. सेवा, साधना आणि दान यामुळे आपले प्रारब्ध शुद्ध होत जाते आणि आपणास हळूहळू आपण करीत असलेल्या साधना, उपासना यांचा अनुभव येऊ लागतो, तर दुसऱ्या बाजूने आपल्या अडचणी दूर होत जातात. आपल्याला मार्ग मिळत जातो. जीवनात स्थिरता येते. हळूहळू सुख-समृद्धी येऊ लागते आणि आपलीही अध्यात्मिक प्रगती होत जाते आणि हे आपल्याला कळते स्वतःचे स्वतःलाच. मग आपल्या आयुष्यात भगवंताची कृपा पाहून मन भरून येते. त्याच्या कृतज्ञतेची जाणीव होते आणि अंतःकरणात खऱ्या भक्तीचा जन्म होतो. कारण इथपर्यंतचा प्रवास जरासा खडतर असतो. कारण माणूस म्हटला की, त्याला दुःख आलेच आणि मग ते दुःख अनावर झाले की मग माणूस निदान त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तरी देवाची भक्ती करतो. कारण सुखी माणूस ईश्वर भक्तीकडे वळत नाही. मुळात या जगात कोणी सुखी नसतं. प्रत्येकाला काही ना काही दुःख असतं, फक्त जो श्रीमंत आहे तो सुखी असल्याचा आव आणतो, पण तो श्रीमंत देवभक्त असेल तर तो आहे त्यात समाधानी राहतो आणि जे नाही ते भगवंताच्या इच्छेवर सोडून देतो.

म्हणून सांगतो, प्रत्येकाला काही ना काही त्रास, अडचणी आहेत. त्यांचाच सतत विचार करत राहून त्या वाढवू नका तर उपाय करायला सुरुवात करा. बघा असं म्हणतात की, पूर्व जन्मात जे काही कर्म मग ते सत्कर्म अथवा कुकर्म असो त्यानुसार आपल्या वाट्याला प्रारब्ध येत असते. पण त्याचबरोबर हेही खरे आहे की ‘जन्मोजन्मी असतील पुण्याच्या राशी तरच नाम येईल ओठी’ आणि एक सर्वश्रुत गोष्ट तुम्हाला माहीतच असेल. महाभारतातील कुंती हिने दुःख मागून घेतले होते का तर श्रीकृष्णाचे सतत स्मरण व्हावे म्हणून, कारण माणसाला दुःखात देव आठवतो, हे एकदम खरे आणि सर्वसामान्य आहे, तर मग जर आपल्या नशिबी काही दुःख आहे म्हणजे देवाने आपल्याला निवडले आहे. त्याची इच्छा आहे की, तू माझी भक्ती, सेवा करावी.

याचा अर्थ आपण नशिबवान आहोत की परमेश्वराने आपल्याला ही संधी निर्माण करून दिली नाही तर कोणाला वेळ आहे आजकाल देवासाठी मग निदान स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी तरी त्या भगवंताची नियमित काहीतरी एकच उपासना रोज करावी. रोज सकाळी अथवा संध्याकाळी श्री स्वामी समर्थ ११ वेळा जपावे अथवा कुलदेवतेच नाव घ्यावे. आपले पुण्य ईश्वरचरणी जमा होतेच. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला, नातू- पणतूला त्याचा फायदा होतोच. संकट समयी देव उभा राहतोच. दिनरात सर्वांनी म्हणा, 'श्री स्वामी समर्थ'

स्वामी समर्थ तारक मंत्र

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना । प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना । अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला।।२।।

उगाची भितोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळू दे । जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा।।३।।

खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त । आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात।।४।।

विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात। हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती, ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।

श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु | श्री स्वामी समर्थ महाराज की जय । श्री दत्तगुरू महाराज की जय ।

भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी !

[email protected]

Comments
Add Comment