Friday, May 9, 2025

अग्रलेखसंपादकीय

मालदीवला मोदींनी शिकवला धडा

मालदीवला मोदींनी शिकवला धडा

भारत आणि मालदीव यांच्यात इतके दिवस सौहार्दाचे वातावरण होते, आता ते दूषित झाले आहे. मालदीवच्या तीन मंत्र्यांवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अपमानजनक टिप्पणी केली म्हणून कारवाई करण्यात आली आहे. मालदीवला भारताचे सिनेस्टार वर्षानुवर्षे सुट्ट्यांच्या दिवसांत जात असत. पण आता मोदी यांच्याविरोधात अभद्र टिप्पणी केल्याबद्दल या मंत्र्यांना मालदीव सरकारने मत्रिमंडळातून बडतर्फ केले आहे. वास्तविक पंतप्रधान मोदी हे लक्षद्वीपला गेले होते. तेथे त्यांची स्नॉर्कलिंग करतानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आणि त्यावर तीन मंत्र्यांनी अभद्र टिप्पणी केली. मोदी यांना विदूषक म्हटले. आता इतकी गलिच्छ भाषा पंतप्रधानांबद्दल वापरल्यावर समाजमाध्यमांत याचा संताप उमटणे साहजिकच आहे. त्यानुसार अनेक सोशल मीडियावर मालदीवच्या मंत्र्यांविरोधात आणि सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. पण भारत हा मालदीवचा पर्यटनाचा मुख्य स्त्रोत आहे. कित्येक भारताच्या लोकांनी मालदीवला आपल्या आरक्षित केलेल्या सुट्ट्या रद्द केल्या. मालदीवच्या पर्यटनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचे भान आल्यावर मालदीव सरकारने त्या तीन मंत्र्यांना बडतर्फ केले आहे. वास्तविक पंतप्रधान मोदी यांच्यावर टिप्पणी करण्याची काहीही गरज नव्हती, पण काही लोकांना खाज सुटलेली असते आणि ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. तसेच आता घडले आहे. पण या वादाचा परिणाम मालदीवसारखे राष्ट्र भोगणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात ज्या टिप्पणी करण्यात आल्या आहेत, त्यांना समर्थन देणारे पाकिस्तानी जास्तीत जास्त आहेत. पाकिस्तानची जी अवस्था आहे ती पाहता पाकिस्तानी लोकांची आता मालदीवच काय, पण इस्लामाबादलाही जाण्याची क्षमता नाही. भुखेकंगाल झालेले राष्ट्र आहे आणि त्यांनी कितीही मोदी विरोधातील टिप्पणीला समर्थन केले, तरीही नुकसान शेवटी मालदीवचे आहे. मालदीव येथील मोदी यांच्याविरोधाचे जनक नेहमीप्रमाणे भारतातील विरोधक आहेत. त्यांनी असल्या फडतूस आंदोलनाला समर्थन दिले आहे. मोदी यांना निवडणुकीतून दूर करू शकत नाही, म्हणून जास्तीत जास्त क्षुद्र डावपेच वापरण्यावर आता विरोधक उतरले आहेत. लक्षद्वीपमधून वारंवार निवडून येणारे खासदार होते हमीद अन्सारी. त्यांनी भारताचे उपराष्ट्रपतीपद भूषविले. त्यांना काँग्रेसच्या राजकारणात हे पद मिळाले होते. त्यातून काँग्रेसला आपली अल्पसंख्याकांची व्होट बँकही सांभाळता आली, पण याच हमीद अन्सारी यांनी राज्यसभेच्या सभापतीपदावरून निवृत्त होताना भारताविरोधात गरळ ओकले होते. त्यांना भारताचे तत्कालीन काँग्रेस सरकार डोक्यावर घेऊन नाचत होते. आता लक्षद्वीपचे पर्यटन वाढविण्यासाठी भारतातील विरोधकांचा पाठिंबा असल्याने मालदीवच्या पर्यटनात मिठाचा खडा टाकण्याचे कारस्थान या प्रकरणामागे आहे.

भारतातील पर्यटनावर अख्खा मालदीवसारखा देश चालतो. त्या देशाच्या पर्यटनाला जोरदार झटका बसला आहे आणि त्यामुळे मालदीवच्या तीन मंत्र्यांना पदावरून जावे लागले आहे. हे उचित झाले आहे. भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या सापांना दूध पाजणे भारताने बंद केले आहे, याचे प्रत्यंतर आले आहे. लक्षद्वीप हे मालदीवमध्ये आहे आणि मालदीवचा समुद्रकिनारा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पण येथे आता पर्यटनक्षेत्र रसातळाला गेल्यात जमा आहे. पाकिस्तानच्या समर्थकांनी आपला काहीही संबंध नसताना मालदीवच्या तीन मंत्र्यांचे समर्थन केले, पण त्यामुळे याचा मालदीवला जसा फटका बसला, तसे मालदीवला लवकरच भान आले आणि आता त्या तीन मंत्र्यांना घरी बसविले आहे. पाकिस्तानची अवस्था भुखेकंगाल झाली असताना ते मालदीवमध्ये जाऊन काय पर्यटन वाढविणार हा साधा प्रश्न मालदीव सरकार लक्षात घेत नसेल, तर मग त्या सरकारचे अकलेचे दिवाळे वाजले आहे, हे समजण्यासारखे आहे. लक्षद्वीप असो की मालदीव, हा बहुतेक भाग अल्पसंख्याकबहुल आहे, पण त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी काँग्रेसचे तत्कालीन सरकार जीव टाकत असे.

महाराष्ट्रातील एक वयोवृद्ध नेतेही आपली अल्पसंख्याकांची व्होट बँक जपण्यासाठी प्रयत्न करीत असत. आता त्यांचा पक्षच फुटल्यामुळे त्यांचा ही नाईलाज आहे. ज्या मंत्र्यांना बडतर्फ करण्यात आले आहे, त्यांत तिघेही अल्पसंख्याक आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न असला, तरीही अभिव्यक्तीचा वापर लोकशाही पद्धतीने व्हायला हवा, असे मालदीव सरकारने त्या मंत्र्यांना सुनावले आहे. हे प्रकरण मालदीवला खूप जड जाणार आहे, कारण मालदीवची पर्यटन व्यवस्था यामुळे कोसळून पडणार आहे. त्या चिमुकल्या देशाला इतके नुकसान सोसणार नाही, पण मालदीव असो की लक्षद्वीप, भारत द्वेष्ट्यांना सारासार विवेक राहत नाही, त्यामुळे देशाचे नुकसान अटळ आहे. वास्तविक मालदीवचे पंतप्रधान निवडून आले की, प्रथम भारताला भेट देत असतात. इतके संबंध निकटचे आहेत. पण लक्षद्वीपचे पर्यटन वाढू नये, म्हणून कोणता देश या मंत्र्यांच्या ट्वीट कारस्थानामागे आहे, याचा शोध घ्यावा लागेल.

कदाचित हे चीनचे कारस्थान असू शकते. कारण त्याला पडद्याआड राहून खलनायकी कारस्थाने करण्याची सवय लागली आहे. चीन आणि पाकिस्तान या षडयंत्रामागे असू शकतात, पण पाकिस्तानला स्वतःच्या जगण्याची भ्रांत पडली आहे, तरीही भारताचे जिथे नुकसान करणे शक्य आहे, तेथे तो करीत असतो. पण पाकिस्तानला धडा शिकवणे भारताला काहीच अवघड नाही. त्यामुळे भारतातील मिनी पाकिस्तानांनी उठाव केला तरीही भारताने आता पाकिस्तानला आणि भारताविरोधात कारस्थाने करणाऱ्या छुप्या लोकांविरोधात कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. लक्षद्वीपचे पर्यटन वाढले किंवा न वाढेना, पण मालदीवला भारताने चांगली तंबी दिली आहे आणि त्यामुळे इंडिया आघाडीमधील मालदीवचे समर्थक आणि पाकिस्तानातील समर्थक आपली वळवळ थांबवतील, ही आशा आहे.

Comments
Add Comment