
नवी दिल्ली : नवी दिल्लीत द्वारका येथे नव्याने बांधलेल्या भारत आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्रात (आयआयसीसी) १३ ते १४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ९वी जी -२० संसदीय अध्यक्षांची शिखर परिषद (पी -२०) आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ ऑक्टोबर २०२३ रोजी शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.
जी-२० देशांव्यतिरिक्त, अन्य १० देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था या शिखर परिषदेत सहभागी होतील आणि आतापर्यंत २६ राष्ट्राध्यक्ष १० उपराष्ट्राध्यक्ष, ०१ समिती अध्यक्ष आणि आयपीयू अध्यक्षांसह ५० संसद सदस्य आणि १४ महासचिवांनी या परिषदेत सहभागी होण्याविषयी संमती दिली आहे, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. संपूर्ण आफ्रिकन संसदेचे अध्यक्ष प्रथमच भारतात होणाऱ्या पी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत, असे बिर्ला यांनी सांगितले.
'वसुधैव कुटुंबकम् - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या भावनेने, भारताचे उद्दिष्ट हे अधिक समावेशक, शांततापूर्ण आणि न्याय्य जगाच्या दिशेने जटील जागतिक समस्यांवर सहमती-आधारित उपाय प्रदान करण्याचे आहे, असे ओम बिर्ला यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बिर्ला यांनी माहिती दिली की, पी-२० शिखर परिषदेदरम्यान शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेला गती देणे, शाश्वत ऊर्जा संक्रमण, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि सार्वजनिक डिजिटल मंचाद्वारे लोकांच्या जीवनात परिवर्तन अशी चार उच्चस्तरीय सत्रे आयोजित केली जातील.
समता, सर्वसमावेशकता आणि शांतता यावर आधारित प्रमुख जागतिक आव्हानांवर उपाय प्रदान करण्यासाठी जी-२० सरकारांना आवाहन करणाऱ्या संयुक्त निवेदनाने शिखर परिषदेचा समारोप होईल, अशी माहिती बिर्ला यांनी दिली.