
पुणे : सातत्याने होणारी वाहतूक कोंडी पाहता सरकारने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यासाठी नवी योजना आखली आहे. या नव्या योजनेमुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच प्रवासही आणखी वेगवान होणार आहे.
दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहन संख्या यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. हा महामार्ग सध्या सहा पदरी आहे. मात्र इतके असतानाही या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे तीन तासाच्या प्रवासासाठी पाच ते सहा तास घालवावे लागतात.
यावर उपाय म्हणून सरकारने हा महामार्ग आठ पदरी करण्याचे ठरवले आहे. या योजनेसाठी सुमारे अडीच हजार कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ लवकरच याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार आहे.
देशातील सर्वात पहिला महामार्ग अशी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची ओळख आहे. मुंबई-पुणे या दोन शहरांना जोडणारे अंतर या महामार्गामुळे कमी करण्यात आले. मात्र वाढती वाहनसंख्या तसेच येथून प्रवास करणाऱ्यांची वाढलेली संख्या यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरून दररोज ८० हजारापेक्षा अधिक वाहने धावतात.