Tuesday, May 13, 2025

श्रध्दा-संस्कृतीसाप्ताहिक

Wamanrao Pai : आनंदाचा सागर

Wamanrao Pai : आनंदाचा सागर
  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

जीवनविद्या तुम्हाला आनंद दुसऱ्यांना वाटायला शिकवते. जीवनांत आपण कुठलीही गोष्ट कशासाठी करतो? आनंदासाठी. आनंदासाठी करतो पण बरेचदा होतो त्रास. उपवास करणे हा तपश्चर्येचा प्रकार आहे. नवस कशासाठी करतात? देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी करतात. तीर्थयात्रेला जातात ते देवाजवळ काहीतरी मागत असतात. उपास-तापास करतात त्याबदल्यांत देवाजवळ काहीतरी मागत असतात. अमूक अमूक गणपती नवसाला पावतो, असे आपण म्हणतो व जो नवसाला पावतो तोच देव लोकांना माहीत असतो. त्याच्याकडे ही गर्दी होते. खरेतर नवसाला पावणारा गणपती व इतर गणपती यांत काहीच फरक नसतो. लोकांचे अज्ञान किती आहे हे आपल्याला यावरून दिसून येते. सांगायचं मुद्दा लोक नवस करतात व देवाजवळ जाऊन काहीतरी मागतात. उपवास करतात व देवाजवळ जाऊन काहीतरी मागतात. तीर्थयात्रा करतात व देवाजवळ जाऊन काहीतरी मागतात. देवाकडून काही मिळाले की सुखी होतात व देवाकडून काही मिळाले नाही, तर दुःखी होतात. सुखी होण्यासाठी ही सगळी धडपड असते, आनंदी होण्यासाठी जी सगळी धडपड असते ही लक्षात घेऊनच जीवनविद्या सांगते तुम्ही हा आनंद वाटायला शिका. तुम्ही ज्यावेळेला वाटेल की, लुटणे आलेच. लुटणार कधी? आधी वाटणे महत्त्वाचे आहे. वाटले की ते आपल्याकडे automatically आपोआप येणारच. तुम्ही म्हणाल आमच्याकडे आनंद आहे कुठे? आपण आनंदाचे समुद्र आहात.

जे जे पाहिसी ते ते सुखात्मक असे येईल लक्षी तुला तू आनंद समुद्र विश्व लहरी जाणूनी घोटी मुला

सांगायचा मुद्दा, आपल्या ठिकाणी आनंदाचा सागर आहे. तो कधीही आटत नाही, विटत नाही, तो कधीही संपत नाही म्हणून “आनंद वाटा आनंद लुटा.” आनंद दिला म्हणजे स्वानंद दिला. असतो तो स्वानंद. स्वानंद दुसऱ्याला देतो तेव्हा होतो तो आनंद. आनंद दुसऱ्याला दिला की त्याला होते ते सुख. ते सुख आपल्याकडे बुमरँग होवून परत येते तेव्हा आपल्याला होते ते समाधान. ही सर्व आनंदाची रूपे आहेत. सुख-समाधान-शांती ही सर्व आनंदाचीच रूपे आहेत. हा जो आनंद आहे तो द्यायला शिकतो, तेव्हा तो आपल्याकडे बुमरँग होऊन परत येतो. फक्त देण्याची क्रिया करा. लोकांना हे शिकविले जात नाही. आज परमार्थातल्या लोकांना हे शिकवले जाते का? ते बघा. फार मोठ-मोठ्या गोष्टी सांगितल्या जातात. पण आनंद द्यायला शिकवले जात नाही. बाकीच्या गोष्टींसाठी किती खर्च, किती कष्ट, किती वेळ जातो. हे कशासाठी पाहिजे. याची गरज नाही. फक्त आनंद द्यायला शिका व हे शिकलात की, आपोआप तुमच्या जीवनांत आनंद बुमरँग होऊन अनंत पटीने परत येईल. तुमचे घर व तुमचे जीवन म्हणजे आनंदाचा स्वर्ग होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment