
मुंबई: ठाणे जिल्ह्यातील कळवा शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात भेट दिली. या रुग्णालयात एकाच दिवसात १८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात रविवारी एका महिन्याच्या बाळासह आणखी चार जण दगावले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तेथील रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. सोबतच अपेक्षित बदलही सुचवले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबतची कारणे जाणून घेतली. तसेच तेथील उपस्थित डॉक्टरांकडून उपचारांबाबतची माहिती घेतली. दरम्यान, रुग्णालयात घडलेले हे मृ्त्यू दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच येत्या २५ ऑगस्टला याबाबत नेमलेल्या समितीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, या दुर्घटनेचे कोणीही राजकारण करू नये असेही त्यांनी सांगितले. येथील डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचारी रुग्णांना बरे करण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. त्यांमुळे अशा घटनांचे राजकारण करून तेथील अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाऊ नये. त्यासोबतच अशा दुर्घटना महाराष्ट्रात घडू नयेत यासाठी यंत्रण सजग राहील असेही आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.माळेगावकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते.
मनसे झाली आक्रमक
दरम्यान, कळवा येथील मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रचंड आक्रमक झाली होती. त्यांनी यावेळे मनपा आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले. यावेळी मनसेकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच या घटनेची जबाबदारी आयुक्तांनी घ्यावी अशी मागणी केली होती.