
अर्ज करणे महागल्याने अल्प-अत्यल्प गटांमध्ये नाराजी
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०२३च्या सोडतीसाठी अनामत रक्कमेत वाढ करणार नसल्याचे याआधी जाहीर केले होते. ही सूचना अत्यल्प व अल्प गटासाठी लागू होती. परंतु आता अत्यल्प व अल्पसह सर्व उत्त्पन गटाच्या अनामत रक्कमेत वाढ केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
२०२३ मध्ये म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, अत्यल्प गटासाठी २५ हजार, अल्प गटासाठी ५० हजार, मध्यम गटासाठी एक लाख रूपये तर उच्च गटासाठी दीड लाख रूपये अशी अनामत रक्कम प्रस्तावित केली जाणार आहे. याचा प्रस्ताव लवकरच म्हाडा उपाध्यक्षांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सोडती नंतरची संपूर्ण प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन केली आहे. तसेच नव्या प्रक्रियेसह सोडत काढताना पुणे आणि कोकण मंडळाने अनामत रक्कमेत वाढ केली आहे. रक्कम वाढल्यामुळे या दोन्ही मंडळाच्या सोडतीला सुद्धा कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
म्हाडाकडून स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होते. मात्र अनामत रक्कमेत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.
सर्व नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. उत्पन्न गटांवर आधारित, राज्य सरकार लॉटरी प्रणाली आयोजित करते. इडब्ल्यूएस, एलआयजी, एचआयजीमध्ये हे विभागलेले आहेत.