
- शेअर बाजारासाठी काळा दिवस
- सात लाख कोटी रूपयांचे नुकसान
मुंबई : शेअर बाजारासाठी सोमवार, १३ जुनचा दिवस हा काळा दिवस असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे सात लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स १,४५६ अंकांनी घसरला तर निफ्टीही ४२७ अंकांनी घसरला.
अमेरिकेतील महागाईचे परिणाम शुक्रवारी वॉल स्ट्रीटवर बघायला मिळाले होते. त्यात फेडकडून येणाऱ्या बैठकीत व्याजदर ०.७५ टक्क्यांनी वाढविण्याचा विचार असल्याने त्याचा दबाव जगभरातील बाजारांवर दिसत आहे. बाजारातील लिक्विडिटी कमी झाली तर त्याचा फटका शेअर बाजारांना बसत असतो आणि हाच फटका भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. मोठ्या प्रमाणात समभागांची विक्री बघायला मिळाली आहे.
सेन्सेक्समध्ये आज २.६८ टक्क्यांची घसरण झाली असून तो ५२,८६४ स्थिरावला. निफ्टीमध्ये २.६४ टक्क्यांची घसरण होऊन तो १५,७७४ अंकांवर स्थिरावला. शेअर बाजार बंद होताना ६५० कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर २७५९ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. ११७ कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
आज शेअर बाजार बंद होताना बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, टेक महिंन्द्रा, इंडसलँड बँक आणि हिंदालको इंडस्ट्रीज कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर नेस्ले इंडिया आणि बजाज ऑटो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. बीएसई मिडकॅपमध्ये २.७ टक्क्यांचा तर स्मॉलकॅपमध्ये ३ टक्क्यांची घट झाली आहे.
डॉलरच्या तुलनेत आजही रुपयाची घसरण झाली आहे. शुक्रवारच्या ७७.८४ रुपयाच्या तुलनेत सोमवारी रुपयाची किंमत ७८.२८ रुपयांवर पोहोचली आहे. रुपयाची ही आतापर्यंतची निचांक्क पातळी आहे. आज शेअर बाजार बंद होताना सार्वजनिक बँका, खासगी बँका, आयटी, रिअॅलिटी, कॅपिटल गुड्स, ऑटो, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये २ ते ४ टक्क्यांची घसरण झाली आहे.