
मुंबई (हिं.स.) : राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधान परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये ११ उमेदवार रिंगणात असणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली असून भाजपाचे पाच, तर महाविकास आघाडीचे सहा उमेदवार एकमेकांशी भिडणार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपा पुरस्कृत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीच्या वतीने शिवाजीराव गर्जे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता विधान परिषदेच्या १० जागांसाठी एकूण ११ उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
कोणत्या पक्षाचे उमेदवार रिंगणात
भाजपा - १) प्रवीण दरेकर, २) राम शिंदे, ३) श्रीकांत भारतीय, ४) उमा खापरे आणि ५) प्रसाद लाड
शिवसेना - १) सचिन अहिर, २) आमशा पाडवी
राष्ट्रवादी - १) रामराजे निंबाळकर, २) एकनाथ खडसे
काँग्रेस - १) भाई जगताप, २) चंद्रकांत हंडोरे
सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव - फडणवीस
सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि असंतोष आहे. त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा होती, पण काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे न घेतल्याने निवडणूक होत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी आमची पाचवी जागा निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सहावी जागा लढणे शक्य नसल्याने सदाभाऊंचा अर्ज मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यसभेप्रमाणे चमत्कार होणार याची चर्चा सुरू - चंद्रकांत पाटील
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दावा केला आहे की, काही सत्ताधारी आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेप्रमाणे चमत्कार होणार याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यसभा ये तो झांकी है २० तारीख अभी बाकी है| विधान परिषद निवडणुकीतही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल.
देशमुख-मलिकांना मतदानाची परवानगी मिळणार का?
दरम्यान राज्यसभा निवडणुकीत एकेक मत महत्त्वाचं असताना राष्ट्रवादीचे तुरुंगात असलेले आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी मुंबई सत्र न्यायालयानंतर उच्च न्यायालयाकडूनही नाकारण्यात आली होती. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी तरी यांना परवानगी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.