पनवेल : दि.बा. सर्वांचे बाप होते, त्यांनी सर्व महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आहे, त्यामुळे दि.बां.चे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही, अशा शब्दात नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कोल्ही कोपर येथे नवी मुंबई विमानतळ क्षेत्रात झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत केली. तसेच ठाकरे सरकारला भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडावी, अशा शब्दात घणाघाती टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून दि.बा. यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरूवारी भूमिपुत्रांची 'भूमिपुत्र परिषद' आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गणपत गायकवाड, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष भोईर, कॉम्रेड भूषण पाटील, भारतीताई पवार, माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, नंदराज मुंगाजी, संतोष केणे, गुलाब वझे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, दशरथ भगत, उपमहापौर सीता पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, राजाराम पाटील, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, सुनिल म्हात्रे, रुपेश धुमाळ, सदानंद वास्कर, कांचन घरत, सुनील पाटील, प्रशांत पाटील, गोवर्धन डाऊर, के. के. म्हात्रे, सीमा घरत यांच्यासह रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली आदी विभागातील समस्त हजारो भूमिपुत्र उपस्थित होते. तत्पूर्वी दिबांच्या पनवेल येथील संग्राम निवासस्थानी, तसेच जासई येथे तसेच गावोगावी दिबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.