मुंबई : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊ नयेत अशी सरकारची भूमिका आहे. यासंदर्भात आज विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत या संदर्भातला प्रस्ताव आज विधानसभेत मांडला जाणार आहे.
ओबीसी आरक्षणावरून मध्य प्रदेशात निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर आता राज्यातही निवणुकांसाठी तोच पॅटर्न राबवला राबवला जाण्याची शक्यता दिसतेय. त्यासाठी आज विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होतेय. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत पुढचे किमान सहा महिने निवडणुका पुढे ढकलाव्यात असा प्रस्ताव आज विधानसभेत मांडला जाणार आहे. ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.
निवडणुका 4 ते 6 महिने पुढे ढकलल्या जाव्यात - विजय वडेट्टीवार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 ते 6 महिने पुढे ढकलल्या जाव्यात ही आमची भूमिका आहे, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. निवडणुका पुढे ढकलल्यानंतर तरतुदींनुसार प्रशासक नेमला जाणार आहे. मध्य प्रदेश सरकारनं ठराव करुन निवडणुका पुढे ढकलण्याची शिफारस केली. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका 4 ते 6 महिना पुढे ढकलल्या जाव्या असा ठराव आज महाविकास आघाडी करते आहे.
ओबीसीशिवाय निवडणूका होऊ नये याकरता सर्वपक्षीय बैठक घेऊन विधानसभेचा ठराव करुन तो ठराव निवडणूक आयोगाकडे दिला जाईल. 4 ते 5 महिन्यात इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम करु. याकाळात डेटा गोळा करण्याचं काम होईल आणि प्रश्न सुटेल अशी 100 टक्के खात्री आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.