
सौराष्ट्र (वृत्तसंस्था): महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचे काही खरे नाही. ड गटात पाचव्या सामन्यात मंगळवारी चंदिगडविरुद्ध त्याने १६८ धावांची चमकदार खेळी करत संघाला पाच विकेटनी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. पाच सामन्यांत सर्वाधिक ६०३ धावांचा पराक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. चार शतकांमध्ये ५१ चौकार अन् १९ षटकारांचा समावेश आहे.
चंदिगडविरुद्ध ३१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराजने पुन्हा एकदा कर्णधाराला साजेशी खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड व वाय नाहर यांनी पहिल्या विकेटसाठी १०९ धावा जोडल्या. पण, नाहर ३८ धावांवर माघारी परतल्यानंतर महाराष्ट्राची गाडी घसरली. राहुल त्रिपाठी ( ०), अंकित बावणे ( १२), नौशाद शेख ( ०) हे झटपट माघारी परतले. ऋतुराजने १३२ चेंडूंत १२ चौकार व ६ षटकारांसह १६८ धावांची खेळी केली. ए काझीनं नाबाद ७३ धावा करताना महाराष्ट्राला ५ विकेट राखून विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करताना मनन वोहराच्या १४१ धावा आणि अर्सलन खान ( ८७) व कौशिकच्या ( ५६) अर्धशतकांच्या जोरावर चंदिगडगने ७ बाद ३०९ धावा केल्या.पी. दाधेने ४९ धावांत ४ विकेट घेतल्या. विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२मध्ये १६८ धावांची खेळी ही ऋतुराजची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. त्याने या स्पर्धेत १५०.७५च्या सरासरीने धावा कुटल्या. त्यानं एकूण ५१ चौकार व १९ षटकारही लगावले.
ऋतुराज गायकवाडनं यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक ६०३ धावांचा पराक्रम केला आहे. त्यानं केवळ पाच सामन्यांत चार शतकांसह ही आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेश ( १३६ धावा), छत्तीसगड (नाबाद १५४), केरळा ( १२४) व चंदिगड (नाबाद १६८) अशी चार शतकं ऋतुराजनं विजय हजारे ट्रॉफीत झळकावली आहेत. विराट कोहली (२००८-०९), पृथ्वी शॉ (२०२०-२१) व देवदत्त पडिक्कलनंतर ( २०२०-२१) एका पर्वात चार शतकं करणारा तो चौथा फलंदाज बनला.