
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृह, चित्रपटगृह सुरू होणार आहेतच मात्र त्या पाठोपाठ हॉटेल्स आणि दुकाने उशिरापर्यंत खुली ठेवण्याची देखील परवानगी दिली आहे. मात्र नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले.
राज्यासह मुंबईतील हॉटेल्स रात्री १२ तर दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. सध्या काही दिवस सणांचे आहेत. हे सणांचे दिवस लक्षात घेता हे निर्णय घेण्यात आले आहेत. सणांच्या दिवसात हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र ही गर्दी होऊ नये यासाठी दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट यांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. त्यानुसार हॉटेल्स रात्री १२ तर दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
उपाहारगृहे आणि दुकाने जास्त वेळ सुरू ठेवण्याची मागणी होत होती. त्यानुसार त्यांच्या वेळा वाढवण्यात आल्या असून यासोबतच त्यासंदर्भातील कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तर पालिकेने देखील मुंबईतील दुकाने, रेस्टॉरंट यांच्यासाठी सूचना जाहीर केल्या आहेत. या सगळ्या नियमांमध्ये सूट मिळाली असेल तरी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. अन्यथा कारवाई केली जाणार आहे.
रेस्टॉरंट, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दुकाने, रेस्टॉरंटमधील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक फेस मास्क अनिवार्य सॅनिटायझरचा वापरही अनिवार्य गर्दीवर नियंत्रण