Thursday, May 8, 2025

कोकणमहाराष्ट्ररायगड

इंधनानंतर भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला

इंधनानंतर भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला

विजय मांडे

कर्जत : इंधनाच्या दरांनी शंभरी पार केली आहे. त्यातच भर म्हणून सर्वसामान्य तथा श्रीमंतांना लागणारी रोजची आवश्यक गोष्ट म्हणजे भाजीपाला. या भाजीपाल्याचे भावही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा हताश सवाल सर्वसामान्य विचारत आहेत.

कोरोना महामारीमुळे दीड ते दोन वर्षे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली तर, अनेकांचे व्यवसाय-धंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली असून घरगुती गॅस हजारी गाठण्याच्या स्थितीत आहे. इंधनाच्या भाववाढीचा भडका उडाला आहे. त्यातच आता रोजच्या जीवनात लागणाऱ्या भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले असून या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिक बेजार झाला आहे.

भाजीपाल्याचे दर वाढल्याने मटार- २०० रुपये किलो, फ्लॉवर - ८० रुपये किलो, कोबी - ४० रुपये किलो, टमाटर - ६० रुपये किलो, घेवडा - ७० रुपये किलो, काकडी - ५० रुपये किलो, गवार - ८० रुपये किलो, मिरची - ६० रुपये किलो, वांगी - ८० रुपये किलो, भेंडी - ६० रुपये किलो, फरसबी - ६० रुपये किलो, लालभोपळा - ५० रुपये किलो, तोतापुरी आंबा - १५० रुपये किलो, राजमा - १२० रुपये किलो, तोंडली - ६० रुपये किलो, सुरण - ६० रुपये किलो, काकडी - ४० रुपये किलो, बिट - ४० रुपये किलो, गाजर - ६० रुपये किलो, सिमला मिरची - ७० रुपये किलो, शेवगा शेंगा - १२० रुपये किलो, आले - ६० रुपये किलो, कांदा - ५० रुपये किलो, बटाटा - २० रुपये किलो, मशरुम - २०० रुपये किलो, तर पालेभाजींमध्ये मेथी - ३० रुपये जुडी, कांद्याची पात - ३० रुपये, शेपू - २० रुपये, मुळा - २० रुपये, कोथिंबीर - ६० रुपये जुडी झाली आहे.

भाव का वाढले?

या भाववाढीबद्दल अनेक वर्षांपासून कर्जत बाजारपेठेत भाजी विक्री करणारे शिवनारायण लोदी यांनी सांगितले की, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. होलसेल बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत.

भाजीपाला ही रोज लागणारी वस्तू आहे. भाजीपाल्याचे भाव वाढले तरी खरेदी करावीच लागते. मात्र सर्वसामान्यांचे कंबरडे भाववाढीमुळे मोडले आहे. - सुनिल ठोंबरे, ग्राहक

Comments
Add Comment