लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घरगुती भांडणामुळे एका पतीने आपल्याच घराला आग लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोबतच पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. घटनेची सूचना मिळताच अग्निशमन दलाचे जवान तेथे पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
हे प्रकरण मेरठच्या कंकड ठाणे क्षेत्रातील अमोलिक कॉलनीमधील आहे. येथे अग्निशमन दलाला दुपारी एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने दलाचे जवान तेथे पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. चौकशीदरम्यान असे समजले की हे घर भूपेंद्र नावाच्या व्यक्तीचे असून तो टेलरिंगचे काम करतो. भूपेंद्रने गृहक्लेशामुळे घरात आग लावली.
भूपेंद्रचे १० वर्षांपूर्वी निधीशी लग्न झाले होते. दोघांमध्ये पैशावरून सातत्याने वाद होत असे. रविवारी पुन्हा एकदा भूपेंद्र आणि निधी यांच्यात वाद झाला. निधी कशीतरी घरातून बाहेर पडली आणि जवळच्या आपल्या माहेरी गेली. भूपेंद्रला वाटले की निधी आतमध्ये आहे आणि त्याने घराला आग लावून दिली असा आरोप त्याच्यावर आहे. त्यानंतर तो तेथून पळून गेला.
घराला आग लागल्याने संपूर्ण घर धुराने भरून गेले. मोठमोठ्या आगीच्या ज्वाळा निघत होत्या. शेजाऱ्यांनी आगीचे लोळ पाहिले आणि फायर सर्व्हिस टीमला सूचना दिली. त्यांनी तातडीने तेथे धाव घेत आग विझवली.
आपले घर जळताना पाहून निधी आपल्या मुलांसह आणि आईसह तेथे पोहोचली. निधीने सांगितले, पती सातत्याने तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. तिने नकार दिला तेव्हा तो भांडायला लागला. त्याला राग आला. आधी त्याने मला खोलीत बंद केले होते. आणि त्यानंतर बाईकमधून पेट्रोल काढू लागला. शेजारच्या काकींनी मला यातून सोडवले आणि मुलांना घेऊन मी माहेरी गेली. या दरम्यान त्याने घराला आग लावली. मलाही जाळून मारण्याचा प्रयत्न करत होता.