मुंबई : राज्यात सुरू असलेल्या विकासामुळे विरोधक बिथरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. एखाद्याला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसून फेसबूकवरून सरकार चालवणाऱ्यांचं ते काम नाही, असा टोला त्यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबाला त्रास दिला, आता एक तर ते राहतील किंवा मी राहीन असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू झाला. महाविकास आघाडीची अडीच वर्षे आणि आमच्या महायुतीच्या सरकारची दोन वर्षे यांची तुलना करता लोकांना समजेल. राज्यात सुरू असलेल्या विकासकामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच पातळी सोडून टीका केली जाते. एखाद्याला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतो. आम्ही फिल्डवर उतरतो आणि काम करतो. त्यामुळे लोकांची पसंती आम्हालाच आहे. येत्या काळात राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे.