मात्र मतदान झाल्यानंतर मिळालं खास प्रमाणपत्र; नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील मतदान (Voting) पाच टप्प्यांत पूर्ण झाले असून आज देशभरात सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यात दिल्ली, हरयाणा, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेशांतील ५८ जागांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत मतदानाच्या वेळी अनेकांची मतदार यादीत नावेच नसणे, मतदान केंद्र बदललेले असणे असे अनेक प्रकार समोर आले, ज्यामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांना देखील आज अशाच प्रकाराला सामोरं जावं लागलं. पण शेवटी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.
एस. जयशंकर सकाळी दिल्लीतील तुघलक लेनमधील अटल आदर्श शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचले आणि मतदानाच्या रांगेत जवळपास २० मिनिटे उभेही राहिले, पण त्यांना त्या ठिकाणी मतदानच करता आलं नाही. येथील केंदातील मतदार यादीत त्यांचं नाव आढळून आलं नाही. त्यामुळे मतदान न करताच त्यांना घरी जावं लागलं. घरी जाऊन तपास केला असता त्यांचं मतदान केंद्र वेगळं असल्याचं समोर आलं. नंतर त्यांनी दुसऱ्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
Cast my vote in New Delhi this morning.
Urge all voting today to turnout in record numbers and vote in this sixth phase of the elections. pic.twitter.com/FJpskspGq9
— Dr. S. Jaishankar (Modi Ka Parivar) (@DrSJaishankar) May 25, 2024
मतदान झाल्यानंतर मिळालं खास प्रमाणपत्र
मतदान पार पडल्याची एक पोस्ट एस जयशंकर यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. नवी दिल्लीतील लोकसभा मतदारसंघ-०४ मतदान केंद्र क्रमांक-५३ येथे एस जयशंकर यांनी मतदान केलं. त्या मतदान केंद्रावर मतदान करणारे ते पहिलेच पुरुष ठरले. तशा प्रकारचे प्रमाणपत्रही नवी दिल्लीच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने त्यांना देण्यात आले.