धाराशिव : राज्यात अनेक जिल्ह्यांना एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पाणीकपातीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मान्सून तोंडावर आला असला तरीही पाणीटंचाई सहन करावी लागत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच धाराशिवकरांना आणखी मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या पंपगृहांना महावितरणमार्फत होणारा विद्युतपुरवठा सध्या सुरू असलेल्या पावसाळी वादळवाऱ्यांमुळे खंडित होत आहे. तसेच उजणीचा जलाशयात पाणीसाठा नसल्याने शहरात अत्यल्प प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शहराला नऊ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. म्हणून शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मावळ तालुक्यात पाण्याची टंचाई
मावळातील नाणेगावात देखील पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मावळ तालुका हा सर्वात जास्त पर्जन्यमान असणारा तालुका समजला जातो. मात्र तीव्र उन्हाच्या झळांनी मावळ तालुक्यात देखील पाण्याची टंचाई आता भासू लागली आहे. मावळ तालुक्यात मोठी आणि छोटी अशी मिळून ११ धरणे असूनही नाणे गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
नाशिककरांवर दुष्काळाच्या झळा
पाणी टंचाईची टांगती तलवार नाशिककरांवर देखील आहे. नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता वाढली आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या २४ धरणांपैकी ६ कोरडी पडली आहेत. तर ९ धरणांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात शहरासाठी अवघे ८९९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याच्या परिस्थितीत शहराला केवळ ५४ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणीपातळी देखील ५९८ मीटरपर्यंत खालावल्यास जॅकवेलपर्यंत पाणी आणणंही अवघड होणार आहे.