नितेश राणे यांचे संजय राऊतांना सडेतोड उत्तर
मविआमध्ये होतोय प्रकाश आंबेडकरांचा अपमान
मुंबई : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या भारत देशाचा प्रत्येक नागरिक हा त्यांचा म्हणजेच मोदीजींचा परिवार आहे, अशी भावना व्यक्त केली. त्यानुसार काल देशभरात प्रत्येकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर (Social media account) मग तो भाजपाचा असो किंवा नसो ‘मैं भी मोदीजी के परिवार का हिस्सा हूँ’ असं लिहायला सुरुवात केली. त्यावर संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांनी मोदीजींना अशा पद्धतीचा परिवार देशाला संबोधण्याचा अधिकार आहे का? अशी टीका केली. त्यामुळे भाजपा आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. आजवर स्वतःच्या पक्षातील लोकांनाही ज्यांनी परिवार मानलं नाही ते मोदीजींवर कसली टीका करतात?, असं म्हणत नितेश राणे यांनी राऊतांना चपराक लगावली आहे.
नितेश राणे म्हणाले, संजय राजाराम राऊत हे विसरतात की २०१४ मध्ये किंवा २०१९ मध्ये त्यांनीही मोदींजींचा परिवार बनून सगळ्या पद्धतीचा फायदा घेतलेला आहे. २०१४ ते २०१९ असलेली सत्ता असो, जे १८ खासदार निवडून आले ते देखील मोदीजींच्या परिवाराचा हिस्सा होते, म्हणूनच निवडून आले. त्यानंतर मनामध्ये गद्दारी आणि बेईमानी आल्यामुळे आम्ही मोदीजींच्या परिवाराचा भाग नाही आहोत, असं सांगून ते वेगळे झाले.
पण संजय राजाराम राऊतला थोडी आठवण करुन देईन, की त्याचा मालक मुख्यमंत्री असताना २०१९ ते २०२२ पर्यंत त्याने महाराष्ट्राच्या जनतेला तरी स्वतःचा परिवार मानलं का? कारण मुख्यमंत्री असतानाच्या काळात पाटणकर परिवार सोडून त्याने कोणत्याच परिवाराला आपलं मानलं नाही. सर्वांना वाऱ्यावर सोडलं. सामान्य जनता सोडा स्वतःच्या शिवसैनिकांना तरी त्यांनी आपला परिवार मानलं का? ते ठाकरे सरकार नव्हे तर पाटणकर सरकार होतं. एवढे अन्य शिवसैनिक ईडी आणि सीबीआयच्या फेऱ्यात असताना देखील मोदीजी आणि केंद्र सरकारकडे जाऊन पायघड्या फक्त पाटणकरासाठी घालण्यात आल्या, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
दिशा सालियनच्या केसमधूनही माझ्या मुलाला वाचवा, ते पण स्वतःच्या परिवारासाठीच. म्हणजे महाराष्ट्राची जनता यांचा परिवार नाही, शिवसैनिक यांचा परिवार नाहीत, असे लोक मोदीजींवर टीका करतात? ज्या पंतप्रधानांनी आपलं पूर्ण आयुष्य या देशासाठी वाहून घेतलं आहे, त्यांच्यावर परिवारवाद म्हणून टीका करताना संजय राऊताला लाज वाटली पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.
संजय राऊतचा परिवार नेमका कुठला?
स्वतः संजय राऊतने परिवारापलीकडे काही पाहिलं आहे का? कोविडचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे झाले तेव्हा खिचडीच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे मुलीच्या आणि भावाच्या अकाऊंटमध्ये टाकले. अन्य घोटाळ्यांतील पैसे बायकोच्या अकाऊंटमध्ये. शिवाय नेमका संजय राऊतचा परिवार कुठला? हाही एक विचारण्यासारखा प्रश्न आहे. त्यांचा परिवार नेमका भारतातला आहे की रशियातला आहे?, असा खोचक सवाल नितेश राणे यांनी विचारला.
…तर आज ते बेघर झाले नसते
संजय राऊत सतत पंतप्रधान मोदींना मणिपूरला जायचे सल्ले देतात, पण आधी स्वतः पत्राचाळीतल्या मराठी माणसांकडे त्यांनी लक्ष दिलं आहे का? त्यांना जर आपला परिवार मानलं असतं तर आज ते बेघर झाले नसते, असं नितेश राणे म्हणाले.
लोकसभेच्या मतदानानंतरही मविआच्या बैठकाच सुरु असतील
मविआच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले, संजय राऊत सतत तारखा देतात की या तारखेला जागावाटपाचा प्रश्न सुटेल पण अजूनही तो सुटत नाही. यांचीच भांडणं संपत नाहीत आणि आता त्यांना प्रकाश आंबेडकरांनाही सोबत बसवायचं आहे, म्हणजेच लोकसभेच्या मतदानानंतरही मविआच्या बैठकाच सुरु राहतील, तोपर्यंत लोक मोदीजींना मतदान करुन मोकळे होतील, अशी नितेश राणे यांनी मविआची खिल्ली उडवली.
प्रकाश आंबेडकरांचा अपमान कशाला करता?
विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकरांना ४ ते ५ जागा देऊ असं म्हटलं आहे. यावर नितेश राणे यांनी हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबियांचा अपमान आहे, असं वक्तव्य केलं. जर खऱ्या अर्थाने हे बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे, त्यांचा मानसन्मान ठेवणारे लोक असतील तर प्रकाश आंबेडकरजींना १० ते १२ जागा द्या, ४ ते ५ जागा देऊन त्यांचा अपमान कशाला करता?, असं नितेश राणे म्हणाले.