मुंबई : राज्यभरात ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी (Grampanchayat Election) इच्छुकांची लगबग सुरू असतानाच, निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. (Offline Application Form Allowed for GramPanchayat Election)
राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यातील सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दिनांक २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२२ (दुपारी ३ वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत सादर करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे. अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी देण्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती.
अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरताना वेबसाईट चालत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावात गेल्या दोन दिवसांपासून ५० पेक्षा अधिक उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रात रात्र जागून काढत आहे. मात्र, असे असताना उमेदवारांना दोन दोन दिवस अर्ज भरण्यासाठी लागत आहे. अशातच, निवडणूक आयोगाने विशेष आदेश जारी करत ऑनलाइन आग्रह सोडून ऑफलाइन अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे. याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार यांना माहिती देण्यात आली आहे.