नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वेगवेगळ्या तंत्रांचा वापर वेगवेगळ्या कारणांनी केला जाऊ शकतो. सीमेवर टेहळणी, विवाह समारंभ तसेच अन्य ठिकाणी ड्रोनचा वापर होतो; परंतु आता शेतीत ड्रोनचा वापर करण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे. शेतीत ड्रोनचा वापर सुरू केल्यास पाच लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.
शेतात ड्रोनचा वापर केल्यास लाखोच्या संख्येने रोजगारनिर्मिती होईलच; शिवाय खर्च वाचून शेतीत आमुलाग्र बदल होतील, असा दावा करण्यात येत आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या एका अहवालानुसार, ड्रोनचा शेतात वापर वाढवल्यास फायदा दिसून येईल. केंद्र सरकारने शेतात ड्रोन वापरास प्रोत्साहन दिल्यास देशाच्या सकल उत्पन्नात वाढ होऊ शकते. देशाचा जीडीपी एक ते दीड टक्क्यांनी वाढू शकतो. एवढंच नाही तर, फोरमच्या दाव्यानुसार या माध्यमातून स्वयंरोजगार आणि रोजगारनिर्मितीही होऊ शकते. ड्रोनचा वापर वाढल्यास यासंबंधीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. देशात तब्बल पाच लाख लोकांच्या हाताला काम मिळू शकते.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या अहवालानुसार भारतीय कृषीसाठी ड्रोनचा वापर केल्यास कृषी क्षेत्रात पुन्हा एक क्रांती येऊ शकते. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने अदाणी समूहाच्या मदतीने हा अहवाल तयार केला आहे. त्यात कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदलासह रोजगारनिर्मितीची बाब स्पष्ट करण्यात आली आहे. या अहवालात विविध संशोधनांचा आधार घेत भारतातल्या शेतीक्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्याचा दावा करण्यात आला आहे. तांत्रिक आणि आधुनिक यंत्रांचा वापर करून शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकते, असा दावा करण्यात येत आहे.
अहवालानुसार, ड्रोन आणि तंत्रज्ञानाचा कुशल वापर केल्यास शेतीक्षेत्रात १५ टक्के उत्पादन वाढू शकते. कृषी उत्पादन ६०० अब्ज डॉलर होऊ शकते. हे लक्ष्य साध्य करण्यात ड्रोनची मोठी मदत होईल. केंद्र सरकारने या क्षेत्रात वेळीच लक्ष्य घातल्यास ड्रोन आणि तत्सम उद्योगांमध्ये ५० अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक वाढू शकते, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. या माध्यमातून भारतात येत्या काही दिवसांमध्ये पाच लाख तरुणांना रोजागार मिळू शकतो.