Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांनी वाझे-शर्मा यांच्यासोबतच्या संबंधांचा खुलासा करून महाराष्ट्राची माफी मागावी

मुख्यमंत्र्यांनी वाझे-शर्मा यांच्यासोबतच्या संबंधांचा खुलासा करून महाराष्ट्राची माफी मागावी

भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : उद्योगपती अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करून मनसुख हिरेनच्या हत्येच्या कटात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांचा सहभाग असल्याचा व त्यासाठी सचिन वाझे याने ४५ लाखांची सुपारी प्रदीप शर्माला दिल्याचा आरोप एनआयएने प्रतिज्ञापत्राद्वारे केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता या प्रकरणात गप्प न राहता वाझेची पाठराखण करून महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपाध्ये म्हणाले की “सचिन वाझे काही लादेन आहे का?” असा सवाल करत वाझेची विधिमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिले पाहिजे. मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याला ४५ लाखांची सुपारी दिल्याची व या कटाची आखणी पोलीस आयुक्तालयात झाल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. सचिन वाझेप्रमाणेच प्रदीप शर्मा हेसुध्दा शिवसेनेमध्ये होते. त्यांनी शिवसेनेतर्फे निवडणूकही लढवली होती.

त्यांचे शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे. त्यातच, हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचीही माहिती समोर आली आहे. एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. तसेच हे दोघे पोलीस अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हेही समोर आले पाहिजे, अशी मागणी उपाध्ये यांनी केली.

बाकी प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या व अन्य नेत्यांवर सुपारीबाजीचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या बोलघेवड्या नेत्यांनी शिवसेनेशी संबंध असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलीस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का, याचे उत्तर द्या, असे थेट आव्हान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

याच वाझेचे निलंबन रद्द करून त्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तगादा लावला होता. त्यामुळे या गुन्हेगारांसोबतचे लागेबांधे संशयास्पद आहेत. त्यामुळे मूग गिळून गप्प न राहता ठाकरे यांनी समोर येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीची पाठराखण करून महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल व पोलीस दलाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे केल्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणीही उपाध्ये यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -