मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागातील एका विनोदावरून सोशल मीडियावर टीका सुरू झाली आहे. या भागात काश्मिरी आणि बिहारी समाजाबद्दल झालेल्या विनोदावरून वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी समय रैनाच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्याच्यावर टीका केली आहे. ( Samay Raina)
‘इंडियाज गॉट लेटंट’च्या या भागात अभिनेत्री अर्चना पूरन सिंह प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. स्टॅन्डअप कॉमेडियन शेरॉन वर्माही या भागात होती. शेरॉन बिहारची असल्याने तिची ओळख करून देताना समयने बिहारशी संबंधित विनोद केला. त्यानंतर समयच्या काश्मिरी पार्श्वभूमीवरून शेरॉननेही त्याच्यावर विनोद केला. दोघांमध्ये बिहार आणि काश्मीरवरून विनोदांची जुगलबंदी झाली.
https://www.prahaar.in/2026/08/29/chief-minister-fadnavis-makes-all-out-efforts-to-assist-citizens-from-maharashtra-stranded-in-nepal-404-citizens-safe-contact-established-with-338/
मात्र, या संवादातील काश्मिरी पंडितांशी संबंधित संदर्भावरून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे. काश्मिरी पंडितांचे विस्थापन आणि त्यांच्याशी संबंधित इतिहास हा संवेदनशील विषय असल्याने अशा प्रकारच्या विनोदावरून वाद निर्माण झाला आहे. ( Stand Up Comedy)
भाजप आमदार राम कदम यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काश्मिरी पंडितांचा अपमान करणारे वक्तव्य स्वीकारले जाणार नसल्याचे म्हटले आहे. प्रसिद्धीसाठी आक्षेपार्ह वक्तव्य करणे आणि त्यानंतर माफी मागणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. काश्मिरी पंडितांनी दहशतवादामुळे विस्थापनाचा सामना केला असून त्यांच्या वेदनांची खिल्ली उडवणे चुकीचे असल्याचे राम कदम यांनी म्हटले.
कलाकारांच्या स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे, मात्र कोणाच्याही भावना आणि श्रद्धा दुखावतील अशा वक्तव्यांनाही मर्यादा असायला हव्यात, असे राम कदम यांनी सांगितले. दरम्यान, विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच समय रैनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार झाला होता. या पार्श्वभूमीवर त्याच्या ताज्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद चर्चेत आला आहे. ( Indias Got Latent)