Nashik : पावसाळ्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सप्तशृंगगड घाटातील (Saptashrungagad Ghat) भवरी धबधब्यांजवळ (Bhavari Waterfalls) अपघाताची शक्यता वाढली आहे. यापुर्वी छोटे, मोठे अपघात होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) तातडीने संरक्षण कठडे आणि लोखंडी जाळी बसवावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविकांमधून होत आहे.
संरक्षण भिंत नसल्याने खोल दरीत पडण्याचा धोका
सप्तशृंगगडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढते. घाट रस्त्यावर ठिकठिकाणी कोसळणारे धबधबे आणि हिरवेगार जंगल पाहण्यासाठी भाविक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. याशिवाय अनेक भाविक धबधब्याच्या प्रवाहात उतरून फोटो काढतात व आंघोळ करतात. रस्ता अरुंद आणि निसरडा असल्याने घसरणे तसेच वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी संरक्षण भिंत नसल्याने खोल दरीत पडण्याचाही धोका आहे.
प्रशासनाने वेळीच उपाययोजना करावी
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षीही येथे किरकोळ अपघात झाले होते. प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. धबधबे असलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लोखंडी संरक्षण जाळी, कठडे आणि सूचना फलक बसवावेत. तसेच वाहनतळासाठी जागा निश्चित करून वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
...अन्यथा मोठी दुर्घटना
सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी लोखंडी संरक्षण जाळी, कठडे आणि सूचना फलक बसवावेत. तसेच वाहनतळाची व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त वाढवावा. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.- लक्ष्मीकांत पाठक, सामाजिक कार्यकर्ते, सप्तशृंगगड






